वासुदेव बळवंत फडके- एक झंझावात!
अखेर या दूर देशीच्या भयंकर कारागृहात या *महान आत्म्याने* ते शरीर सोडलेच एकदाचे ---पण हा आत्मा लौकिक अर्थाने _अनंतात_ वगैरे विलीन होणार नव्हता ----कारण या आत्म्याने भयंकर प्रतिज्ञा केली होती---" मी मरून जाईन , पण या दुष्ट , चांडाळ , प्रजाभक्षक इंग्रजांना मेल्यानंतर ही शांतता लाभू देणार नाही " -----आणि तेच खरे झाले --मग पुढे लगेच त्याच वर्षीच्या २८ मे ला या आत्म्याने शरीर धारण केले _विनायक_ _दामोदर सावरकर_ याचे---- ----आता तो आत्मा अगदी मुक्त झाला होता व त्याला कुठलेही बंधन उरले नव्हतेच ...मग त्याने अनेक शरीरे धारण केली ... मग तो थांबला कधीच नाही ---कधी ते मदनलाल धिंग्राचे , कधी अनंत कान्हेरे , कधी भगतसिंग , कधी राजगुरू , व पुढे मग तो आत्मा या दुष्ट इंग्रजांना या देशातून घालवूनच शांत झाला ----
तो या महान आत्म्याच्या मुक्तीचा दिवस होता - *१७ फेब्रुवारी* *१८८३* , ठिकाण- एडन चे कारागृह , ते शरीर होते *वासुदेव* *बळवंत फडके* यांचे !!
१८५७ चा उठाव थंड होऊन बऱ्यापैकी कालावधी उलटला होता .भारतीय जनमानस गुलामगिरीच्या वातावरणात जणू काही सरावल्यासारखे झाले असतानाच वासुदेवराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बंड केले , त्यावेळी त्यांच्यावर ब्रिटिशांनी काय आरोप लावले होते ते बघूया ;
१ .ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारणे .
२. सत्तेविरुद्ध अप्रिती निर्माण करणे .
३ .दारुगोळा व शस्रे गोळा करणे
४ .लुटालूट करणे .
असे चार भयंकर आरोप ठेवलेले हे पहिलेच क्रांतिकारक !
यश मिळणे वा अपयश मिळणे या दृष्टीने महान लोक कधीच काम सुरू करत नाहीत ..ते फक्त काम सुरू करतात व थांबत कधीच नाही ..वासुदेवराव असेच होते . आज आपणास त्यांचा जन्म कधी झाला , मृत्यू कधी झाला हे तपशील सहज माहीत असतात पण ते जीवन कशासाठी जगले होते हे आपण सतत विसरून जात आहोत .. आणि कदाचित हीच आपली सतत विसरण्याची सवय आपल्या प्रिय भारत देशाला घातक ठरली आहे .
वासुदेवराव फडके यांना इंग्रजांची जुलमी सत्ता मान्य नव्हती . ते म्हणतात , " _--_ज्या भूमीच्या_ _पोटी आपण जन्म घेतला_ , _तिच्याच पोटी सर्व लेकरे झाली_ . _त्यांनी_ _अन्न _-_ अन्न _करत उपाशी मरावे_ , आणि आपण _कुत्र्याप्रमाणे पोट भरत राहावे_ हे _मला पाहवले नाही म्हणून ब्रिटिश सरकारविरुद्ध मी_ __बंड__ _पुकारले__ !!!" त्या वेळी भयंकर दुष्काळ पडला होता , पण हे ब्रिटिश सरकार लोकांना मरणी सोडून कुठल्याही ठोस उपाययोजना करत नव्हते , स्वतः वासुदेवराव सगळीकडे फिरले ,त्यांनी बघितले की जनतेचे हाल कुत्रेही खात नव्हते व हे बघूनच त्यांचे मन पेटून उठले ..
हे सर्व बघूनच त्यांच्या लक्षात आले हे इंग्रज आपल्या देशाचे कधीही व कुठलेही भले करणार नाही ..आपला देश लुबाडणे हेच एक त्यांचे ध्येय आहे ----- त्यामुळेच या देशातून त्यांना घालवून द्यायचे असेल तर अजून एक सशस्त्र लढा उभा करणे याशिवाय दुसरा पर्याय असा नाहीच ...पण तेव्हा आजूबाजूला परिस्थिती पूर्ण विरुद्धच होती , त्यांना अनुकूल असे काहीच दिसत नव्हते ...
ही चर्चा करताना मी अजून थोडे मागे वाचकांना नेऊ इच्छितो .. तसं जेव्हा वासुदेवराव एका युरोपियन कंपनीत काम करत होते तेव्हा त्यांचा पगार होता तीस रुपये ...तेव्हा सोने होते दहा रुपये तोळा , म्हणजेच आजच्या काळानुसार आपण हिशोब लावला तर त्यांचा पगार होता _तब्बल दीड लाख रुपये_ ( सध्या सोने जवळपास ५० हजार रुपये तोळा आहे ) ...म्हणजे वाचकहो बघा त्यांनी ठरवले असते तर किती मजेचे आयुष्य जगू शकले असते ..
तसे आजही आपल्याला बहुधा हे क्रांतिकारक मंडळींचे आयुष्य , ध्येय समजत नाही , तसेच त्या काळातही होतेच ...कारण चांगली सुखाची नोकरी , कुटुंब सोडून इंग्रजांना या देशातून घालवायच्या गोष्टी करण्याऱ्या या वासुदेवाला पुण्यातील पांढरपेशा समाज वेडाच किंवा भ्रमिष्ट म्हणत असत ...आणि हो खरे तर ते वेडेच झाले होते ----ते वेड होतें स्वातंत्र्याचे , ते वेड होते मुक्तीचे --
आपलीं आई आजारी असूनही त्यांना कंपनीत रजा मिळाली नाही , पुढे तिच्या वर्षश्राद्ध ला जाण्यासाठी ही त्यांची रजा नामंजूर करण्यात आलीं..ही सुरुवात होती त्यांचा ब्रिटिशांविषयी राग वाढण्याचा , पण जे बंड पुकारले , ते मात्र सर्वसामान्य रयतेचा कळवळा आल्याने हेच काय ते खरे !!
त्यावेळेस पुणे म्हणजे पांढरपेशा वर्ग जास्त असलेले 'पुणे 'झाले होते ! *लोकहितवादी* सारख्या नेत्यांना ब्रिटिश सरकार म्हणजे ईश्वराची कृपा वाटू लागले होते ..त्याचवेळी वासुदेवराव उघडपणे ब्रिटिशांच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले , पण त्यांना लक्षात आले की पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना योग्य असे साथीदार मिळणार नाही ..म्हणून ते खेडोपाडी फिरू लागले व त्यांची गाठ रामोशी (म्हणजेच रामवंशी ) लोकांशी पडली ..हे रामोशी लोक असे होते ज्यांच्यात लढवय्या बाणा अजून शिल्लक होता ...स्वतः वासुदेवराव काही कमी नव्हते , ते स्वतः धावत्या घोड्यावरून बंदुकीने अचूक नेम साधायचे, पाठीच्या बाजूने अशी उलटी भिंत चढून जायचे , कित्येक मैल अंतर पळत जायचे , भर पुरात उडी मारणे , तुटक्या कड्यावरून उड्या मारणे इ .शिवाय त्यांचे शरीर अतिशय काटक व पीळदार असे होते .. हे वाचून असे वाटले की आजही आपल्या देशातील तरुणांना निदान काही वर्षे लष्करी शिक्षण सक्तीचे केलेच पाहिजे , ज्याद्वारे सैनिकांना नेमके काय सोसावे लागते हे ही कळेल व प्रत्येक तरुणांच्या अंगात लढण्याची शक्ती तयार होईल ...
इथे एक अजून महत्वाची गोष्ट लक्षात आली की वासुदेवराव हे स्वतः ब्राह्मण असूनही त्यांनी सगळ्या जातीच्या लोकांची सेना उभी करून ब्रिटिशांना टक्कर दिली ,यावरून त्याकाळात ही अजून जातपात, भेद असा फारसा हिंदुस्थानात नव्हता , किंबहुना या इंग्रजांनीच पुढे धुर्तपणे आपल्या आपल्यात भांडणे लावून *जातीयवाद* वाढवला व आजही काही विशिष्ट राजकारणी तेच करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत व अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे , असो ------
शस्र विद्येत वसुदेवरावांचे गुरू होते *उस्ताद लहुजी साळवे* ! आजही लहुजी यांचे नाव आपण अभिमानाने घेतो .याच लहुजी साळवे यांच्याकडे महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी ही शिक्षण घेतले होते ( आजही आपण शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूस गेलो तर यांचे घर दिसते , तिथे तसा निळा फलक आहे )
_बाळ गंगाधर टिळक_ - पुढे *लोकमान्य टिळक* म्हणून मान्य पावलेले बाळ टिळक यांनीही प्राथमिक शस्रे शिक्षण वासुदेवरावांकडे घेतले होते , शिवाय टिळक हे स्वतः उत्तम गणिती होते .
वासुदेवराव ही बंडाची तयारी करताना त्यावेळी प्रसिद्ध झालेले *श्री गोंदवलेकर महाराज* यांचीही भेट घेतली होती .महाराजांनी तेव्हा ही बंडाची योग्य वेळ नाही म्हणून सावध करण्याचा प्रयत्न केला , पण वासुदेवराव इंग्रजांना या देशातून घालवून देण्यासाठी उतावीळ झाले होते .
काही दिवसांच्या प्रयत्नाने त्यांच्याकडे रामोशी लोकांचे सैन्य तयार झाले होते व धनासाठी त्यांनी अनेक श्रीमंत सावकार , धनिक यांच्यावर दरोडे टाकून स्वराज्यासाठी पैसे गोळा करू लागले ..याच दरम्यान वासुदेवरावांच्या लक्षात आले की आता कुटुंबाचे सर्व पाश आता तोडून टाकून कायमचे पुढे गेले पाहिजे ..म्हणूनच त्यांनी आपली पत्नी गोपिकाबाई यांना त्यांचे माहेर जुन्नर येथे सोडून आले ..अशा प्रकारे आपल्या अत्युच्च ध्येयाच्या मार्गावर त्यांनी मोहाचे सगळे पूल उध्वस्त केले ( He burned bridges behind ) .
वासुदेव बळवंत फडके खूप धाडसी होते . त्यांना ब्रिटिशांचे मुळीच भय नव्हते ..त्यावेळी एका बाजूला इंग्रज वासुदेवराव यांना पकडण्यासाठी चार हजार रुपये बक्षीस मिळेल अशी पोस्टर्स लावत , त्याच पोस्टर्सच्या शेजारी वासुदेवरांवाची सही असलेलं पोस्टर झळके की " जो कोणी मुंबईच्या गव्हर्नर चे डोके मारून आणेल त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळेल " म्हणजे अशा प्रकारे काही काळ तरी त्यांनी *समांतर* सत्ता स्थापन केली होती ..तर असे धाडसी व वेगळा विचार करणारे होते वासुदेवराव!
क्रांतीची बीजे अशीच असतात , ती पेरली जातात तेव्हा कोणते बीज उगवेल , कोणते बीज मरेल हे आधी माहीत नसतेच , पण कुणीतरी सुरुवात करून ते पेरावेच लागते ..तेच वासुदेव बळवंत फडके व त्यांच्या सैन्याने केले होते ..
वासुदेवराव पुण्यात ज्या नरसिंह मंदिरात राहत तेथे मी जाऊन आलो . तेथे मंदिरात वासुदेवराव यांचा फक्त एक फोटो लावला आहे . त्याचे मालक श्री XX यांना मी भेटलो तर त्यांनी चक्क सांगितले की वासुदेव बळवंत फडके येथे नक्की राहत होते की नाही , याबाबत आम्हाला वा आमच्या मागच्या पिढ्याना काहीच माहिती नाही वा त्यांची एखादी वस्तू वा आठवण असेही आमच्याकडे काही नाही .एकूण तो काळ गुप्ततेचा वा धामधुमीचा असल्याने तशी काही आठवण वा वस्तू शिल्लक राहिली नसावी असे समजून मी काहीसा निराश होऊन परत आलो .
( सोबत काही फोटो जोडतोय , पण असे मानतात की वासुदेवराव येथे १८६५ ते १८७९ असे चौदा वर्षे येथे राहिले , येथे तसा निळा फलक लावलेला आहे ) .
नरसिंह मंदिराच्या जवळच खुन्या मुरलीधर मंदिर आहे , येथेच त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर गुप्त बैठका चालत .
पुढे त्यांच्या कार्यात दौलतराव नाईक , पिलाजी नाईक , रामा कोळी ,कोंडू मांग , खुशाबा साबळे , गणोबा पालकर , कोंडाजी न्हावी , सखाराम महार इ सहकारी मिळाले , जे असे विविध जातींमधील होते व ते सर्व वासुदेवराव यांना ' *महाराज '* म्हणत .
छत्रपती शिवाजी महाराज व वासुदेवराव यांच्या चरित्रात अनेक साम्ये आढळतील ..दोघांनाही साधने कमीच मिळाली ! दोघांनीही अठरापगड जातींमधील लोकांना हाताशी धरले व स्वराज्य निर्मितीची तळमळ व चळवळ केली .. दोघांचेही कार्यक्षेत्र पुणे , कोकण आसपासचा डोंगराळ परिसर हेच होते ---दोघांना ही सशस्त्र क्रांती शिवाय पर्याय नाही हे पक्के ठाऊक होते .... दोघांना ही गनिमी कावा हे युद्धतंत्र वापरले -------
फक्त एकाला त्याच्या कार्यात यश आले , दुसऱ्यास अपयश ! पण म्हणून वासुदेवरावांच्या प्रयत्नांना जराही कमी लेखून चालणार नाही , कारण त्यांनी पेटवलेल्या या मशालीनेच क्रांतिकारी पेटून उठले व वासुदेवराव त्यांचे सतत प्रेरणास्थान राहिले!!
आज मागे वळून पाहता , या सगळ्याच शूर वीरांचा इतिहास , त्यांची आठवण , त्यांच्या कुटुंबियांची आठवण पुसण्याचा सतत व वेळोवेळी प्रयत्न झाला असे दिसून येते ...हे का झाले असेल ?? अनेक प्रश्न पडतात व पडतच राहतात ! मी ही जेव्हा हे वीर जेथे राहिले (पूर्वी मी अभिनव भारत मंदिर-नाशिक येथे गेलो होतो ) , तेथे तेथे गेलो तर स्थानिक लोकांची ही अनास्था दिसली , माहिती अपुरी दिसली , अभिमान वगैरे तर मुळीच नाही दिसला असे चित्र दिसले ....याचे कारण स्पष्टपणे ब्रिटिश सरकार व स्वातंत्र्यानंतर जे सरकार होते त्यांच्या मुद्दाम स्वीकारलेल्या धोरणांत दिसून येते ...जनतेच्या मनावर ही दीर्घकाळ आपल्या भारत देशाला केवळ " अहिंसेच्या" जोरावर स्वातंत्र्य मिळाले हे चुकीचे तत्व ठसविले गेले ! मग कसे कळेल या क्रांतीवीराचें कष्ट , त्यांच्या त्यागाचे महत्त्व ?? पण यात वाचकांनी समजून घ्यावे की ज्या ब्रिटिशांनी लढून , झगडून , विविध प्रकारचे कावे करून भारत देश आपल्या ताब्यात घेतला ते इतक्या सहजासहजी नुसत्या ' अहिंसा ' या तत्वाने देश सोडला असता का ??
हे चित्र बदलायचे आहे ..कवी गोविंदांची कविता वाचा " रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?" मग आपल्या लक्षात येईल की सत्य काय आहे ..कवी गोंविंद काय म्हणतात -
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?।
शेवटी ज्या *वासुदेव बळवंत* **फडके व त्यांच्या कुटुंबाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जो सगळ्या सुखांचा त्यांग केला , स्वतःच्या जिवाचीही पर्वा केली नाही त्या वासुदेवराव यांना आज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून थांबतो !
महत्वाचे असे काही !
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ह्यांच्या स्मारक-कोनशीला समारंभाच्या वेळी कै.सुधाबाई फडके(वासुदेव बळवंत फडके यांच्या सुनबाई ) यांनी रचलेले गीत.
गायिका - निवेदिता सटकर - वासुदेव बळवंत फडके यांची नात .
दिनांक ३ मे १९५७ .
उदघाटन - सर चिंतामणराव देशमुख ( भारताचे पहिले अर्थमंत्री ) - शिरढोन येथील स्मारकाचे .
गीत-
करू प्रणाम थोर जना हिंदनायका l!
पुर्ण चंद्र शोभतसे पौर्णमे पहा, तैसेची विलसती हे देशमुख अहा
सत्य प्रेम निष्ठा ही भारतावरी, त्याप्रेमे वीरांसी वंदना करी
निजहस्ते कोनशीला बसवी स्मारका, करू प्रणाम थोर जना हिंदनायका ...१
शिवराये स्थापियले राज्य आपुले, भगवा ध्वज मानाने भूवरी डुले
लक्ष्मिदेवी राणीने राज्य टिकविले, सुस्वराज्य रक्षणार्थ रक्त सांडिले
आदराने करू आम्ही तिस वंदना, करू प्रणाम थोर जना हिंदनायका......२
अढळ प्रेम देशावर टिळक करितीना, लिहूनी ग्रंथ गीतेचा बोधविती जना
सावरकर तात्याही ध्येयवादी हे, कारागृही दिव्य करिती साहसासि ते
हाची ठेवू आदर्शही पुढील बालका, करू प्रणाम थोर जना हिंदनायका...३
वासुदेव वीरमणी करिती क्रांतीला, परीकीया सत्तेचा डाव उधळीला
हसत जाती फासावर मदनलालजी, राजगुरू चाफेकर भगतसिंगजी
आठवूनी स्मृती त्यांची आज ही मना, करू प्रणाम थोर जना हिंदनायका..४
सुभाष बोस नेताजी झगडले किती, स्वातंत्र्या उभी करिती हिंद्फौज ती
किती गेले होऊन ते वीर बंधू ना, स्वातंत्र्या स्तव करिती आत्म यज्ञ ना
क्रांतिवीर फडक्यांच्या उजळू दिपका, करू प्रणाम थोर जना हिंदनायका...५
धन्यवाद !!
© हेमंत सदाशिव सांबरे
-९९२२९९२३७०.
संदर्भ - वासुदेव बळवंत - डॉ सच्चीदानंद शेवडे
प्रत्यक्ष नृसिंह मंदिरास भेट .
Wikipedia - Google .
छान लिहिले आहे
ReplyDeleteमाहितीपूर्ण, अभिमान जागवणारा लेख
ReplyDeleteVery nice. Well written.. 👍👍👍
ReplyDeleteसुंदर लेख....
ReplyDeleteसुंदर मांडणी व माहिती पूर्ण
ReplyDeleteअभ्यासपूर्ण ऐतिहासिक घटनांवर प्रेरणात्मक लेख सर!👌👍
ReplyDeleteअप्रतिम...
ReplyDeleteछान लेख आहे.
ReplyDeleteफारच अभ्यासपूर्ण लेख अभिनंदन
ReplyDelete