वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे! - अभंग - रसग्रहण- हेमंत सांबरे
तुकाराम गाथा मी दहावीत असताना वाचली होती . तेव्हा त्यातली सोप्पी व मनाला थेट भिडणारी भाषा खूप आवडली होती . जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणजे नुसते संत नव्हते तर ते एक श्रेष्ठ व जागतिक दर्जाचे कवी ही आहेत .
आज मी वाचकांसाठी तुकारामांचा " वृक्षवल्ली आम्हा सोयरे " या अभंगाचा मला समजलेला , भावलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे . हा माझा सगळ्यात जास्त आवडता अभंग आहे . आधी अभंग पूर्ण सांगतो व नंतर एक एक कडवे घेऊन त्याला उलगडत जाऊ ,
.
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ २॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करू ॥ ३ ॥
कंथाकमंडलॊ देहौउपचारा । जाणवितो वारा अवसरू ॥ ४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥ ५ ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥ ६॥
आपल्याला सर्वांना माहीत आहे की तुकोबा हे देहूच्या जवळ भंडारा नावाचा डोंगर आहे तेथे बऱ्याचदा एकांतात जाऊन बसत . त्यांच्या आयुष्यात खूप कठीण काळ येऊन गेल्यावर , त्यांनी आयुष्यात संतपद गाठले होते . या वरील काव्यात त्यांच्या या विचारांचा आविष्कार आपल्याला दिसून येतो . अवघड शब्दांत आयुष्याचे तत्वज्ञान अनेकांनी मांडले आहे , पण सोप्पे शब्द ही तुकारामांची ताकद होती , म्हणूनच हे शब्द, हे काव्य , या ओळी काळाची सगळी कुंपणे , सगळी बंधने ओलांडून आजही पुढेच जात आहेत .
तुकोबा आपले विविध अभंग गात , विठुरायाचे नामस्मरण करत या भंडारा डोंगरावरील कुठल्याही एखाद्या विशाल वृक्षाखाली अगदी भान विसरून ,तल्लीन होऊन गात आहेत . त्याकाळात हा भाग एक प्रकारचे वन वा जंगलच असेल यात काय नवल ? त्यामुळे तुकोबांना हवाहवासा एकांत येथेच त्यांना मिळत असेल . तुम्ही जर तुकोबांचे कुठलेही अभंग वाचले तर लक्षात येईल की रोजचे जीवन , आजूबाजूचा निसर्ग हे त्यांच्या अभंगांत सहज येत राहतात व त्याचवेळी हे अभंग आपल्याला आयुष्य ही शिकवत राहतात . या वनात आजूबाजूचे वृक्ष , वेली , वनात फिरणारे प्राणी हे सगळेच या साधूचे मित्र झाले आहेत , जवळचे सोयरे /नातेवाईक झाले आहेत कारण त्यांचा हा सहवास खूपदा झाला आहे , जसे तुकोबा गात आहेत तसेच पक्षीही अतिशय सुरात गात आहेत . तर असा हा माणसांपासून दूर वनात मिळत असलेला एकांत हाच त्यांना खूप प्रिय झाला आहे .सहसा आपण लोकांमध्ये वावरतो, राहतो तेव्हा अशी शक्यता निर्माण होते की त्यांचे (त्या लोकांचे ) गुण वा दोष आपल्यात ही येतील , पण हा एकांत इतका छान आहे की येथे ना दोष माझ्यात येतील ना गुणही ! येथे तुकाराम यांची
एक उत्कट मनस्थिती झाली आहे असे वाटते . त्यांना निसर्गाचे सान्निध्य इतके हवेसे वाटत आहे की , त्यांना आता असे वाटते की ,'नको ते पुन्हा ते माणसांत जाणे ' , ' नको तोच तो खेळ ' जेथे तेच ते परत परत माझ्या अंगाला गुण-दोष चिकटत राहतील ,त्यापेक्षा हा एकांतच बरा ! येथे मी आणि माझा हा एकांत असे दोघेच ठीक !
जातीपातीच्या , धर्मांच्या भिंती ओलांडून आपले संत ' हे विश्वची माझे घर ' अशी हाक देतात . त्याच अनुषंगाने तुकोबा पुढच्या ओळीत म्हणतात की " हे वर जे विशाल असे अगाध आकाश पसरले आहे तेच माझे छत झाले आहे , व बसायला आसन कुठले तर ही अवघ्या पृथ्वीचंच मी आसन केलं आहे ' इथे तुकोबा स्वतःला खूप श्रीमंत बनवतात . चार भिंतींचे माझे घर , माझी जमीन , माझा पैसा इ माझे-माझे असे आपले आयुष्यभर सुरूच असते पण तुकारामांनी इथे केवढा थोर विचार आपल्याला दिला आहे. निःसंग होणे हेच असावे . इथे एक लक्षात घ्या की' निसर्ग' हा 'तुकाराम' व तो 'सर्वनियंता विठ्ठल' यांना जोडणारा दुवा आहे व तुकाराम त्या निसर्गाला घट्ट धरून ठेवतात .
कंथा म्हणजे जीर्ण झालेले ,फाटलेले कपडे ! कमंडलू म्हणजे साधू पाणी पिण्यासाठी वापरत असत तो तांब्या ! देहाचा जो रोजचा उपचार (व्यवहार ) , देहाची ही हालचाल सुरू राहावी म्हणून आम्ही हे अंगावरची कपडे , कमंडलू इ वापरतो बाकी त्यांचा आम्हा संताना फारसा उपयोग तसा नाहीच ! आजूबाजूला वाहणारा हा वारा एखाद्या अवखळ वासराप्रमाणे आहे , जो आम्हाला या देहाची आठवण करून देतो इतकेच !
असे म्हणतात की तुकोबा जेव्हा या भंडारा डोंगरावर जाऊन बसत तेव्हा देहभान , भूक-तहान विसरून जात . बहुधा तेच वर्णन त्यांनी या पुढील ओळीत केले आहे . त्यांच्या साठी आता हरिकथा सांगणे हेच जेवण झाले आहे व त्याच कथेचा विस्तार करून इतर लोकांना सांगणे हे त्यांचे आवडते काम झाले आहे . व याचेच अनेक प्रकार जसे अभंग , भजन , कथा , कीर्तन असे करून त्याचेच अतिशय आवडीने माझे सेवन (खाणे ) सुरूच आहे ( या ओळींचा असा हाच सोपा अर्थ असावा , यांत गर्भित वा अर्थापलिकडचा काही अर्थ असेल असे मला वाटत नाही ) .
कुठल्याही उत्कृष्ट काव्याचा एक परमोच्च बिंदू बहुधा शेवटच्या ओळींत गाठलेला दिसतो , तसेच येथे ही दिसतंय . या अशा वनातील एकांतात नकळत पणे आपले मन आपल्याशी बोलू लागते व मी व माझे मन असा संवाद /वाद असे दोन्ही सुरू होते . हे जे मन आहे ते माझेच आहे त्यामुळे तिथे खोटं बोलणं शक्यच नाही .म्हणूनच ते मन अशा निवांत वेळी स्वतःशी वाद-संवाद घालू लागते . तुकोबांना कदाचित येथे हेच सांगायचे आहे की जेव्हा केव्हा तुमच्या मनाची द्विधा मनस्थिती होते , पुढे काय करावे कळत नाही तेव्हा कुठेतरी असे एकांतात जाऊन बसा जिथे तुम्ही आणि तुमचे मन सोडून कुणीही असणार नाही, त्या वेळी मग तुम्हाला बरीच उत्तरे मिळतील .
तर ही अशी माझी आवडती कविता आहे . म्हणून त्याचे रसग्रहण माझ्या कुवतीनुसार करण्याचा मी प्रयत्न केला आहे , वाचकांना आवडेल असे वाटते .
मस्तच लिखाण 👌👌
ReplyDeleteखूप छान रसग्रहण 👍
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete