आझाद हिंद सेनेचा ब्रिटिश सत्तेवर निर्णायक घाव !


आझाद हिंद सेनेचा ब्रिटिश सत्तेवर निर्णायक घाव !

याची सुरुवात होते , १९३८ या वर्षी  सुभाषबाबू खरे तर बॅरिस्टर जिना यांना भेटायला आधी गेले होते , पण त्यांनीच त्यांना हिंदूंचे खरे प्रतिनिधी म्हणून सावरकरांची भेट घ्यायला सांगितले . या भेटीचे छायाचित्र सुदैवाने सध्या उपलब्ध आहे (खालीलप्रमाणे ) 

अर्थात या भेटीत नेमके काय बोलणे झाले हे दीर्घकाळ स्वतः सावरकर यांनी सांगितले नाही व सुभाषबाबूंचा  एका विचित्र अपघातात मृत्यू झाल्याने ते ही सांगण्यास उरले नव्हते .  पण पुढे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताच्या सांगता समारंभात या भेटीचे वर्णन केले 

*आझाद हिंद सेना , सुभाषबाबू व सावरकर* 

२२ जून १९४० - सावरकर सदन - सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची भेट झाली होती . या भेटीत नेमके काय झाले हे खुद्द  सावरकरांनी अभिनव भारताच्या सांगता समारंभाच्या भाषणात सांगितले होते , या 1940 ला झालेल्या भेटीत  सावरकर सुभाष बाबूंना उद्देशून म्हणतात ,
" सुभाषबाबू ,मला सांगा की चालू महायुद्धात ब्रिटन सापडले  असताना या संधीचा आपण लाभ का घेऊ नये ? सध्या ब्रिटिश हिंदी सैन्यामध्ये शक्य तितक्या हिंदूंची भरती करण्यासाठी हिंदुसभेच्या ढालीखाली मी जे सैनिकीकरणाचे भारतव्यापी व बव्हंशी यशस्वी होत चाललेले आंदोलन चालवले आहे ,ते मूलतः क्रांतिकारक आंदोलन आहे .आपण त्याच्या विरुद्ध प्रचार करता हे मी जाणून आहे .इतर काँग्रेस पुढारी मंडळींप्रमाणे आपणास ही असे वाटते की मी ब्रिटिशांस मनुष्यबळ साहाय्य करत आहे , पण वस्तुस्थिती काय ते सांगतो . पहिल्या महायुद्धात ही सशस्त्र क्रांतिकारकांनी जर्मनीशी संधी करून , ब्रिटिश हिंदी सैन्यातील जर्मनीच्या हाती पडलेल्या हिंदी सैनिकांतून क्रांती सैन्य कसे उभारले होते  इ प्रकरणांची माहिती सांगितली  .सावरकर पुढे म्हणाले की ' रासबिहारी बोस यांचे हे ताजे पत्र पहा जपान या वर्षीच्या आत युद्ध पुकारील असे दिसते जर असे झाले तर ही संधी आपण गमावू नये .आपण हिंदुस्थानातुन निसटून जपान वा जर्मनी येथे जावे व तिकडे इटली , जपान यांच्या हाती पडलेल्या सहस्रावधी सैनिकांचे नेतृत्व स्वीकारावे. तेथूनच हिंदुस्थानचे पूर्ण स्वातंत्र्य घोषित करावे , जपान युद्धात पडताच साधेल त्या मार्गाने बंगालच्या उपसागरातून वा ब्रह्मदेशातून हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेवर बाहेरून स्वारी करावी . असा काहीतरी साहसी व सशस्त्र पराक्रम केल्यावाचून आपण हिंदुस्थान स्वतंत्र करू शकणार नाही " 

इतके बोलून सावरकर थांबले . 

सुभाषबाबू तेथून निघाले व पुढे ते जर्मनी आणी  तेथून पुढे जपान येथे पोहोचले . शिवाय नेताजींनी ज्या प्रकारे पुढील पावले उचलली त्यावरून लक्षात येते की स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांची 'सावरकर सदन'  येथे जी भेट झाली त्यानंतरचा हा सर्व घटनाक्रम हेच दाखवतो की सुभाषबाबूंना सावरकरांनी दाखवलेला मार्ग योग्य  वाटला व त्यांनी बरोबर तोच मार्ग वापरला  

या भेटीनंतर दि 24 ला सुभाषबाबूlना पाठवलेल्या पत्रात(संदर्भ - सावरकर पत्रसंग्रह क्रमांक ४५, पृष्ठ क्रमांक ३०१ )  सावरकरांनी लिहले आहे , ' तुम्ही आपल्या भेटीचे वेळी काय बोलणे झाले आहे , त्यातील महत्वाची विधेये मी आपल्याकडे थोडक्यात लिहून पाठवावीत .पण तसे न करता हिंदुमहासभेचे ध्येय , धोरणे थोडक्यात सांगणारी माझी नागपूर व कलकत्ता येथील अध्यक्षीय भाषणे मी आपणाकडे पाठवीत आहे , ती आपण वाचून काढावीत ' व वाचकहो या भाषणांत सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय करावे वा केले पाहिजे हेच सांगितले होते व ते वाचूनच चतुर सुभाषबाबूंनी काय समजायचे ते समजून घेतले . 

सावरकर , सुभाषबाबू , रासबिहारी बोस यांनी कसे एकत्र येऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात *निर्णायक भूमिका* बजावली हे आता हे सगळे पुरावे व संदर्भ आपण एकत्र जोडले की समजू लागते . 
हा सगळा घटनाक्रम होत आहे तोच सुभाषबाबू 1941 च्या जानेवारीत रहस्यमय रीतीने गायब झाले .  सावरकरांनी एक पत्रक काढले व त्या पत्रकातून सावरकरांची एक वेगळी वृत्ती दिसून आली , यात सावरकर म्हणतात , 
" सुभाषबाबू कोठेही असले तरी  , उभ्या राष्ट्राची कृतज्ञता, संमती नि सदिच्छा यांच्यापासून त्यांना सदैव स्फूर्ती व समाधान लाभो ! भारतीय स्वातंत्र्याच्या काजासाठी प्रकृती व प्राण यांची पर्वा न करता ते आपले जीवनसर्वस्व वेचत राहतील यात किमपीही संशय नाही " , हे पत्रक सावरकर व सुभाष बाबू यांच्या भेटीत हीच चर्चा झाली असल्याची अजून एक पुष्टी मिळते . 

त्याचवेळी नेहरू मात्र सुभाषबाबू वर प्रखर टीका करत होते व जर सुभाषबाबूनी बाहेरून भारतावर हल्ला केला तर आपण त्यांचा विरोध करू असे सांगत होते , आम्ही तेव्हाचे वृत्तपत्र Bombay Chronical चे कात्रण जोडत आहोत 👇👇 त्यात नेहरू स्पष्टपणे सांगतात की , " Nehru would oppose Bose if He heads aggression " 
जेव्हा सावरकर सुभाषबाबू ना प्रोत्साहन देत होते , तेव्हा नेहरू मात्र म्हणत होते की , " जर आझाद हिंद सेनेने ब्रिटिश भारतावर हल्ला केला तर मी त्यांचा शत्रू म्हणून उभा राहील " 

याच दरम्यान सावरकर आपल्या हिंदू महासभेच्या सभांतून काय सांगत होते ,
" देशाला सैनिकी नि औद्योगिक दृष्टीने सामर्थ्यशाली बनविणे हेच आज हिंदू हिताच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे आणि हे कार्य हाती घेतल्याने 'हिंदू मतदार आपल्याला मते देणार नाहीत ', जर असे खरोखरीच होणार असेल  तर ; त्या निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू हिताचा बळी द्यावा लागत असेल तर अशा परिस्थितीत त्या मतदारांच्या मुर्खपणाला आळवीत बसण्यापेक्षा हिंदू हितासाठीच त्या निवडणुका हरण्याचा धोका पत्करणे हे आपले खरे कर्तव्य आहे " 
म्हणजेच एका बाजूला नेहरू लोकप्रिय घोषणा करून पुढे भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुका जिंकण्याची तयारी करत होते , तर सावरकर मात्र त्याच लोकप्रियतेचा बळी देत देशहित काय आहे त्यासाठी झटत होते . 

सावरकरांनीच सुभाषबाबूंना परदेशात जाऊन सैन्य उभारा असे सांगितले व त्याचवेळी देशाच्या आतील तरुणांना सैनिकी शिक्षण घेण्याचे सतत व दीर्घकाळ आवाहन केले .  सावरकरांची ही दुधारी राजनीती समजून घेण्यात काँग्रेस व त्याकाळातील बरेच नेते अपयशी ठरले ; पण म्हणून  ही नीती अपयशी मात्र ठरली नाही हे आज मागे वळून बघताना आपल्याला कळून येते . 

सुभाषचंद्र बोस जपानला येण्यापूर्वी आग्नेय आशियातील हिंदी स्वातंत्र्य परिषदेत रासबिहारी बोस यांची सर्वाधिकारी म्हणून निवड झाली . पुढे सुभाषबाबू हे मे-जून 1943 ला जपानला पोहचले . पुढे रासबिहारी यांच्या विनंतीवरून  सुभाषबाबूंनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली .दिनांक 21 ऑक्टोबर 1943 ला सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली .
(संदर्भ -स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र - शि ल करंदीकर )

सुभाषचंद्र बोस 25 जून 1944 म्हणतात ,
" When due misguided political whims and lack of vision almost all leaders of political party have been decrying all soldiers in Indian  army as mercenaries (पोटार्थी ) ,it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting the youths of India to enlist in armed forces . These enlisted youths themselves provide us with trained mens & soldiers for our Indian National Army ." म्हणजेच स्वतः सुभाषबाबू सांगत आहेत की सावरकरांनी सतत चालवलेल्या या सैन्य -भरती अभियानामुळेच आझाद हिंद सेनेला प्रशिक्षित सैन्य मिळाले आहे . 

पुढे सावरकरांचे जपान येथील सहकारी *रासबिहारी बोस* आपल्या एका पत्रात सावरकरांना लिहताना   कीं, " तुमची पूर्णतः झालेली सुटका (1937साली सावरकर पूर्ण मुक्त झाले व 1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले  )  हे देवाचे नियोजन असावे . तुम्ही तुमच्या वेगळ्या प्रकारच्या *राजकीय विचारांतून* आपली महानता सिद्ध केली आहे . ब्रिटनचे शत्रू ते आपले मित्र हे तुमचे म्हणणे अगदी  योग्यच  आहे " .
याला ही पुढे जाऊन अजून एक अतिशय महत्वाचा संदर्भ मला मिळाला , तो ही येथे वाचकांसाठी देत आहे ,

सुप्रसिद्ध जपानी लेखक श्री जे जी ओहसावा यांनी " The Two Great Indians In Japan " नावाचे पुस्तक छापले होते . जेव्हा दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्य सिंगापूर वर  चालून गेले तेव्हाचे लढाईचे वर्णन करणारा हा परिच्छेद बघा ,
" The resistance of British Indian force was strong .The chief of Indian National Army { म्हणजेच आझाद हिंद सेना ) proceeded alone to the front line and talked to Indian Officers and Soldiers in the British Indian Army not to be false to their love of India and independence of India . The miracle happened ! The shooting from British Indian Forces stopped ! 
This way , " *SAVARKAR'S* *MILITARISATION POLICY* IN WORLD WAR II
 BEGAN TO SHAPE " 
Surrended British Soldiers (हिंदी सैनिक ) were 45000 . INA absorbed these soldiers and INA army numbers went to 50000 " .
अशा प्रकारे सावरकर जे सतत सांगत की , " सैन्यात शिरा , शस्रे चालवायला शिका , योग्य वेळ आली की बंदुकीची टोके कुठे वळवायची ते ठरवू " , हे जे सांगत ती गोष्ट अशा प्रकारे प्रत्यक्षात आकाराला येऊ लागली . 
म्हणजे आज मागे वळून आपण या इतिहासाचा अभ्यास केला तर लक्षात येते की सावरकर , रासबिहारी बोस , सुभाषचंद्र बोस यांनी कसे  वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले . 

भले आझाद हिंद सेनेने फक्त मणिपूर , इंफाळ , अंदमान-निकोबारचा काही भूभाग जिंकला व त्यांना " चलो दिल्ली " हे त्यांचे लोकप्रिय वचन पूर्ण करता आले नाही , पण आझाद हिंद सेनेच्या याच प्रयत्नाने बाकीच्या जगात पसरलेल्या हिंदी सैन्यात देशप्रेमाची भावना चेतवली . म्हणजेच आपण केवळ ब्रिटिशांचे भाडोत्री व पोटार्थी सैनिक न राहता आपल्या प्रिय मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो हा विश्वास ही त्यांच्यात निर्माण झाला . वीर  सावरकर यांनी  केलेल्या  दीर्घकाळ योजना   व प्रत्यक्ष कृतींचा परिणाम दिसू लागला होता .

वाचकहो ! हा सगळा अभ्यास करण्यापूर्वी मलाही आझाद हिंद सेनेने  भारतीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जे अभूतपूर्व प्रयत्न केले ,त्याची फारशी माहिती नव्हती . दीर्घकाळ आपल्याला हे  सत्य  माहीत झाले नव्हते . पण आज या गोष्टी आपल्यासमोर ठळकपणे येत आहेत . 

जयहिंद !

© हेमंत सांबरे 
9922992370 .
(या लेखमालेतील पुढच्या  व शेवटच्या भागात नाविक दलाचे बंड व जगभरात असलेल्या भारतीय सैन्याने कसा व का  उठाव केला  याची चर्चा करू. ) 


Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर