1946 -नाविक दलाचे बंड व अखेरचा स्वातंत्र्यसंग्राम !

मागच्या व दुसऱ्या भागात आपण आझाद हिंद सेनेने कशा प्रकारे बाहेरून ब्रिटिश भारतीय सत्तेवर आक्रमण केले , इथपर्यंत चर्चा केली . आता तिसऱ्या व शेवटच्या भागात आपण नाविक दलाचे 1946 चे बंड व इतर सशस्त्र दलांनी केलेला उठाव व त्याचे परिणाम यांची अतिशय खोलात जाऊन चर्चा करूया .

पहिल्या भागात आपण बघितले की दुसऱ्या महायुद्धाच्या थोडे आधी व युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती झाली . भारतीय उपखंडाचा नकाशा आपण नीट बघितला तर लक्षात येईल की समुद्रकिनारा ( Sea Coastal ) (खाली चित्र जोडतोय ) 
हा भूभागाच्या सीमेपेक्षा तीन पटीने जास्त होता व आजही आहे . म्हणजेच जर ब्रिटिशांना जर आपल्या भारतातील साम्राज्याचे रक्षण करायचे असेल तर नाविक दल व त्यात त्यांच्यासाठी काम करणारे सैनिक खूप महत्त्वाची भूमिका (Role ) निभावत होते . म्हणजेच हे नौसैनिक कुणाच्या बाजूने आहेत ही गोष्ट खूप नाजूक (Critical ) ठरत होती .

Royal Indian Navy ( ज्यांनी 1946 चा उठाव केला )ची स्थापना होण्यापूर्वी  हे भारताचे समुद्रकिनारे Royal Navy च्या ताब्यात असत व Royal Navy ही सेना British Neval Welfare Force चा एक भाग होती व  दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी फक्त 1200 च्या आसपास ब्रिटिश अधिकारी वा सैनिक होते . दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांनी युद्धाची गरज म्हणून RNA लाच मुख्य नौसेना मानले व त्यात  तब्बल 30000 पेक्षा जास्त (आधीपेक्षा  तब्बल 25 पट जास्त ) सैनिकांची नियुक्ती ( Recruitment ) केली . आता वाचकहो , येथे हे ही लक्षात घ्या  की सावरकर व हिंदुमहासभेच्या व्यापक प्रयत्नांचा हा ही एक परिणाम होता की नौसेनेत ही भरपूर मोठ्या प्रमाणात भारतीय युवक सामील झाले . परत हा मुद्दा आम्ही येथे अधोरेखित (Underline ) करू इच्छितो की , ' सावरकर याच युवकांना सतत सांगत की " सैन्यात शिरा , शस्रे चालविणे शिकून घ्या व योग्य वेळ आली की बंदुकीची टोके कुठे वळवायची आपण बघून घेऊ " आणि याच दीर्घकाळ आखलेल्या योजनेनेच ' नाविक दलाचे बंड " घडवून आणले .

पण ब्रिटिश देखील खूप धूर्त व लबाड होते बरं का ! त्यांनी या सर्व भारतीय सैनिकांना भरती करताना फक्त Naval Rating पद दिले व त्यांना कुठलेही महत्वाची पदे मात्र दिली नाही .Naval Rating म्हणजे अगदी साधे कर्मचारी असतात तशा प्रकारचे पद! महत्वाची सगळी पदे ब्रिटिश स्वतःकडे राखून ठेवत .  शिवाय या भारतीय सैनिकांना सतत वंशभेदाची वागणूक दिली जायची , त्यांचा अतिशय गलिच्छ शिव्या दिल्या जायच्या ,  तसेच  त्यांना जहाजावर ज्या सुविधा मिळत त्या देखील अतिशय निकृष्ट ( Third Class ) दर्जाच्या दिल्या जात . हा वाईट वागणुकीचा एक घटनाक्रम होता , तर दुसऱ्या बाजूने ब्रिटिशांनी सुभाषचंद्र बोस यांच्या  INA च्या पकडलेल्या सैनिकांविरुद्ध खटले भरले होते : या सैनिकांवर लाल किल्यावर सर्वांच्या देखत शिक्षा देण्याचे ब्रिटिश ठरवत होते .  या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांबद्दल व सुभाषबाबू यांच्या बद्दल पण त्यावेळेस पूर्ण भारतातील सर्वसामान्य जनता व सैन्यात काम करणारे भारतीय सैनिक यांच्यात प्रचंड आदराची भावना होती . क्रूर व कपटी इंग्रजांनी मात्र एका बाजूला आम्ही भारताला आता लवकरच  स्वातंत्र्य देत आहोत असे सांगणे सुरू केले होते व दुसऱ्या बाजूने आपल्याच भारतीय सैनिकांवर कारवाई करत होते . म्हणजेच कदाचित अजूनही सैन्याने साथ दिली; त्यांना आपण पूर्वीसारखेच दबावात ठेवले  तर आपण आपले भारतातील राज्य सुरूच ठेवू , असेच त्यांना वाटत होते .म्हणजेच जर नाविक दलाने हा उठाव केला नसता तर स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया अजूनही खुप लांबली असती असे मानायला खूप वाव आहे .   ही दुटप्पी भूमिका चीड आणणारी होती .
म्हणजे  आपल्याला मिळणारी दुय्यम वागणूक व INA च्या सैनिकांवर भरलेले खटले या गोष्टी नौसैनिकाना अपमानास्पद वाटल्या ,  म्हणूनच त्यांनी उठाव केला .
  
वाचकांनी हा घटनाक्रम जोडावा ही विनंती : प्रथम ब्रिटिशांच्या मदतीसाठी आम्ही सैन्यात भरती होऊ या ; पुढे त्याच प्रशिक्षित सैन्याचा वापर करून आझाद हिंद सेना बाहेरून हल्ला करणार ; त्याचवेळी आतून (भारताच्या आतून )जनता व इतर सैन्यदले  ही उठाव करणार . हे सगळे एकाचवेळी घडून आले तर ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याशिवाय पर्याय उरणारच नाही ; ही होती ' _सावरकरांची सखोल व दूरदृष्टीची रणनीती_ !' 

 *_नेमके काय घडले_ ?

तो दिवस होता 18 फेब्रुवारी 1946 ! मुख्य अन्याय होत होता या नेव्हल रेटिंग सैनिकांना जेवण जे मिळत होते ते अतिशय घाणेरडे व अस्वच्छ होते . पण केवळ हेच कारण होते असे नव्हते ; दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने हे सैनिक पूर्ण जग बघून आले , जगातल्या वेगवेगळ्या भूमीवर त्यांनी युद्ध लढले होते व त्यांनी विजय मिळवला होता . या सैनिकांचा आत्मसन्मान ( Self Esteem) आता मोठा झाला होता व आपणही ब्रिटिश सैनिकांपेक्षा कुठेही  कमी नाही हा आत्मविश्वास त्यांना मिळाला होता . मग असे असतानाही त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक त्यांना अपमानास्पद वाटत होती (संदर्भ - 1946 चा अखेरचा स्वातंत्र्यसंग्राम - डॉ यशवंत थोरात ) .
या सगळ्यातून पहिली ठिणगी पडली HMIS TALWAR नावाच्या प्रशिक्षण दलाच्या गोटात ! व त्याचे नेतृत्व केले श्री बलई चंद् दत्त ( B C DATTA ) यांनी . त्यांनी सगळ्या सैनिकांना एकत्र केले व या अन्यायाविरुद्ध उपोषण सुरू केले . दत्त व त्यांच्या सहकाऱ्यांनी " आझादी हिंदी " नावाचा छुपा गट सुरू केला . HMIS TALWAR वरील हे सैनिक सिग्नल विभागातील असल्याने या बंडाचे लोण खुप वेगाने  इतर तळांवर पसरू लागले . 18 फेब्रुवारीच्या सकाळी 1500 कनिष्ठ सैनिक बंडाच्या पावित्र्यात खानावळीच्या बाहेर पडले व त्यांनी सांगितले की , " आम्ही केवळ सोयी-सुविधांच्या मागणीसाठी हा उठाव करत नसून ' स्वतंत्र भारताच्या मागणीसाठी व नवा इतिहास घडविण्यासाठी लढत आहोत " .  मग त्याच दिवशी रॉयल इंडियन नेव्ही मधील तब्बल 20000 खलाशी सैनिकांनी बंड केले ! पुढच्या दोन दिवसांत त्यांनी 70 पेक्षा जास्त जहाजे व मद्रास , कलकत्ता , कराची , जामनगर , कोचीन ,विशाखापट्टण , अगदी अंदमान पर्यंत चें नौदलाचे तळ आपल्या ताब्यात घेतले . ब्रिटिश युनियन जॅक उतरवून तेथे कॉंग्रेस, मुस्लिम लीग व कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे लावले गेले .
अवघ्या 48 तासांत ब्रिटीश सत्तेचे नौदलावरील नियंत्रण संपुष्टात आले .या सैनिकांनी ' नौदल संग्राम समिती ' स्थापन केली . तिचे अध्यक्ष M S KHAN व उपाध्यक्ष MADANSINGH हे झाले . ही समिती फक्त आता भारतीय नेत्यांचे आदेश पालन करील असे त्यांनी जाहीर केले . त्यामुळे हे आता " भारतीय नौदल " झाले होते .जेव्हा ब्रिटिशांकडून मारा सुरू झाला तेव्हा या भारतीय सैनिकांनी त्यांच्या ताब्यात आलेल्या मोठ्या बोफोर्स तोफांची तोंडे गेट वे ऑफ इंडिया , नेव्हल डॉकयार्ड आणि इतर महत्वाच्या ब्रिटिश बिल्डींग कडे वळवली  व उलट ब्रिटिशांना धमकी दिली की ,'"तुम्ही आमचे नुकसान करू पाहाल तर आम्ही या सर्व इमारती पाडून टाकू व उध्वस्त करू ! "  एकूण या 'न भूतो न भविष्यती' बंडा नंतर ब्रिटिशांना कळून चुकले की आता आपली भारतातील सत्ता अंतिम श्वास मोजू लागली आहे . 

स्वातंत्र्य जवळ येऊ लागले आणि हे  आता असे स्पष्ट दिसू लागले की; ते  अहिंसेच्या भोंगळ तत्त्वांने नव्हे तर सशस्त्र क्रांतीनेच मिळू लागले आहे . पण त्यावेळी सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात येऊ लागल्या होत्या . अशावेळी स्वातंत्र्य मिळविण्याचे श्रेय इतक्या सहजी ते सोडणार होते का ? ब्रिटिश तर पुरते घाबरले होते , आता आपली कदाचित पूर्ण कत्तल उडणार या भीतीने त्यांना ग्रासून टाकले होते . या अशा आपल्या गलितगात्र शत्रूची ,ब्रिटिशांची सुटका केली ती काँग्रेस ने ! त्यांनी या धाडसी नौसैनिक बंडाला साथ दिली तर नाहीच ; पण उलट त्यांना शरण यायला सांगितले . मुस्लिम लीगला होऊ घातलेल्या पाकिस्तानची चिंता असल्याने त्यांनी ही हात वर केले . काँग्रेसने कपटी इंग्रजांवर विश्वास ठेवून या बंड केलेल्या सैनिकांना आश्वासन दिले की ते शरण आले तर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही . पण हे आश्वासन खोटे होते (ब्रिटिशांचेही व काँग्रेसचे ही ) . माघार घेतल्यावर तब्बल 400  खलाशी सैनिकांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले व त्यांचा छळ करण्यात आला . पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही या सैनिकांना कुठलीही मदत करण्यात आली नाही व त्यांना नोकरीतून ही कायमचे काढून टाकण्यात आले ( जणू काही स्वातंत्र्यासाठी ते लढले व त्याची त्यांना ही  शिक्षाच मिळाली ) . नौदलाच्या या बंडात अनेक सामान्य नागरिक ही सामील झाले होते व त्यावेळी मुंबईत झालेल्या या गोळीबारात तब्बल 400-हुन अधिक लोक हुतात्मा झाले पण आपल्या इतिहासात त्यांची नावे पुसून टाकली गेली .

उपसंहार 
वाचकहो , या लेखाबरोबर ही लेखमाला इथेच संपत आहे . पण या तीन लेखांतून आम्ही जे मांडले ते जसेच्या तसे व सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे . दीर्घकाळ हे सत्य आपल्यापासून लपवले गेले व परत कुठेही हे छापले जाणार नाही ,लोकांच्या समोर  पण येणार नाही याची ही काळजी घेतली गेली . 
स्वातंत्र्यवीर सावरकर , नेताजी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेनेचे सैनिक तसेच नाविक दलाचे सैनिक यांच्याकडे नुसतेच दुर्लक्षच केले गेले नाही तर या सर्वांना हेतुपूर्वक त्रास ही दिला गेला . नेताजींचा विमान अपघातात गूढ मृत्यू झाला , त्याचे रहस्य अजूनही उलगडले गेलेले नाही . आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्यावर खटले भरले गेले . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी खून खटल्यात विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला गेला (अर्थात त्यातून ते निष्कलंक सुटले ) .नाविक दलातील लढवय्या सैनिकांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना नोकरीतून काढून टाकले गेले व त्यांना परत कुठेही नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्था केली गेली . 
हा कशाचा सूड घेतला जात होता ?  तो ही आपल्याच लोकांवर ? केवळ सत्तेसाठी ! 

पण आज उशिरा का होईना हे सत्य आपल्यासमोर येत आहे , त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे व इतरांना ते  सांगितले  पाहिजे , म्हणून हा लेखनप्रपंच !!
धन्यवाद!
-हेमंत सांबरे 
9922992370 . 

Comments

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर