# अग्निवीर
अग्निवीर
© हेमंत सांबरे
हा विषय अतिशय महत्वाचा असून यावर अतिशय खोलात जाऊन चर्चा व प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे झाले आहे . तो म्हणजे आपले भारतीय सैन्यदल अत्यंत प्रभावशाली करणे व पूर्वी कधीही नव्हते इतके ते सक्षम व बलाढ्य करणे .
फार पूर्वी आपल्या भारत देशावर मुघलांनी अतिशय मोठी व क्रूर आक्रमणे केली . देशाचा मोठा भूभाग दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिला व तेथील जनतेला अतिशय दुःखाचे व कष्टाचे जीवन जगावे लागले . महाराष्ट्रात तर तब्बल साडे-तीनशे वर्षांच्या अंधकारानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वातंत्र्यसूर्य उगवला . तेव्हा मराठ्यांनी अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवत निदान काही भागाला तरी परकीयांच्या जोखडातून मुक्त केले . हिंदूंना परत भाग्याचे दिवस येऊ लागले . परत घराघरात दिवाळी-दसरा मोकळेपणाने साजरे होऊ लागले . तो काळ असा होता की जवळपास प्रत्येक मराठ्यांच्या घराघरांतून निदान एकतरी लढवय्या मराठा वीर शिवरायांच्या सैन्यात भरती असायचा , त्यामुळे प्रत्येक घर स्वराज्याच्या इच्छेने व स्वातंत्र्याच्या इच्छेने प्रेरित झालेले होते . कारण प्रदीर्घ काळ या सर्वांनी खूप खूप अन्याय सहन केला होता . त्यामुळे ही स्थिती अशी होती की प्रत्येक घर हे काही काळ तरी सतत युद्धमय असायचे . याच कारणाने छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अतिशय क्रूर पद्धतीने मारूनही स्वराज्य टिकले , स्वराज्य वाढले व पुढे ते प्रचंड विस्तार पावले . याचे मूळ कारण शिवरायांच्या काळात महाराजांनी प्रत्येक घराला शस्रे दिली ,चालवायला शिकवली व यात स्रिया ही मागे नव्हत्या . संभाजी राजांचा हा धीरोदात्त मृत्यू झाला , त्यांनी अतिशय धैर्याने छळ सहन केला पण औरंग्याची धर्मांतराची मागणी मान्य केली नाही . याचमुळे महाराष्ट्र पेटून उठला व घराघरातील प्रत्येक जण सैनिक झाला , या पुढे तब्बल १८ वर्षे (१६८९ ते १७०७ ) अक्षरशः मराठ्यांचे प्रत्येक घर लढाईत स्वतःची , माझी लढाई असल्यासारखे लढले . म्हणजे आपला राजा नसताना ही , ही माझीच लढाई आहे , स्वराज्य हे माझे आहे असे समजून प्रत्येक मराठा वीर लढला .
याच कारणाने मुघलांच्या राज्याला उतरती कळा लागली व अखेर ते नष्ट होऊन गेले . १७०७ ला औरंगजेबाचा मृत्यू झाला व त्यापुढच्या फक्त ५० वर्षांच्या आत या मराठा वीरांनी दिल्लीवर वर तर भगवा फडकवलाच पण त्याही पुढे जाऊन राघोबादादांनी अटकेपार झेंडे नेऊन रोवले . पुढे पानिपत घडले . या युद्धात महाराष्ट्र एकटा भारत देशाची ढाल बनून लढला व या अखिल भारताचे रक्षण केले . या युद्धात तब्बल ५०००० पेक्षा जास्त मराठी वीरांनी हौतात्म्य पत्करले , तितकेच नुकसान अफगाणी सैन्याचे ही झाले .
हा सगळा इतिहास चर्चा करण्याचे मुख्य कारण म्हणजे इतकी सगळी संकटे येत असूनही हिंदूंच्या हातात तरीही शस्रे होती व ते चालविण्याचे त्यांना प्रशिक्षण ही होते .त्यामुळे मराठयानी दीर्घकाळ देशाचा मोठा भूभाग स्वतंत्र ठेवण्यात यश मिळविले .पण पुढे जाऊन ब्रिटिशांचा पक्ष विजयी झाला . इंग्रज मात्र धूर्त होते . त्यांनी बहुसंख्य असलेल्या हिंदू कडून शस्रे काढून घेतली , त्यांना निशस्र केले . ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरूच राहिली . देशातील स्वातंत्र्याची इच्छा जणू मरून गेली . मग अहिंसेच्या खोट्या व दांभिक वृत्तीने जनमानसाला व्यापून टाकले . लढाऊ वृत्तीचे दमन करण्यात आले . अहिंसेने आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल असे दीर्घकाळ लोकांना सांगण्यात आले . पण तसे काही झाले नाही . ब्रिटिश या देशावर राज्य करतच राहिले व त्यांनी या एकेकाळी अतिशय श्रीमंत असलेल्या देशाला लुटून नेले . शिवरायांच्या काळात त्यांनी सतत लढण्याची वृत्ती मराठ्यांत निर्माण केली होती , त्यामुळे मराठयानी कित्येक परकीय आक्रमणे परतवून लावली . पण आता ब्रिटिश राज्यांत ती शक्यता संपली होती . इथला भारतीय नुसताच शस्रहीनच नव्हता तर त्यांच्यातील लढाऊ बाणा व वृत्ती संपली होती . म्हणूनच स्वातंत्र्य जवळपास दिसत ही नव्हते व तशी आशा ही उरली नव्हती .
पहिल्या महायुद्धात स्वातंत्र्य मिळविण्याची संधी भारताने गमावली होती . दुसऱ्या महायुद्धात मात्र ही संधी परत आली . यावेळी मात्र या सुवर्णसंधी चा लाभ कसा घेतला पाहिजे याचे दिग्दर्शन व मार्गदर्शन करणारा एक द्रष्टा नेता भारताला लाभला ! या नेत्याचें नाव होते " स्वातंत्र्यवीर सावरकर " . सावरकरांच्या दूरदृष्टीने ओळखले की शस्रहीन व लढाऊ वृत्ती संपलेल्या भारतीय तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे . त्यामुळे सावरकरांनी , डॉ मुंजेनी व हिंदू महासभेच्या अनेक नेत्यांनी भारतभर तरुणांना " सैन्यात भरती " करण्याचे अभियान सुरू केले . ज्या ब्रिटिशांनी दीर्घकाळ आपल्या हातातून शस्रे काढून घेतली होती त्याच ब्रिटिशांना नाईलाजाने का होईना स्वतःच्या गरजेपोटी परत भारतीय तरुणांना शस्रे दिली ,ती कशी चालवायची हे ही शिकवले व याच तरुणांना दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष लढाई देखील करता आली . सावरकर तेव्हा प्रत्येक भाषणांत सांगत की , " सैन्यात शिरा , शस्रे चालवायला शिका व योग्य वेळ आली की बंदुकीची टोके कुठे वळवायची ते आपण बघू !"
आणि ती योग्य वेळ आलीच ! त्यावेळी आझाद हिंद सेनेने बाहेरून ब्रिटिश अंकित भारतावर बाहेरून हल्ला केला, नाविक दलाने निर्णायक बंड केले , इतर सशस्त्र दलांनी उठाव करून ब्रिटिशांना सहकार्य करण्यास नकार दिला . या सगळ्या कारणांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाणे भाग पाडले गेले . भारतात स्वातंत्र्याचा सूर्य परत उगवला व तो ही सशस्त्र क्रांती झाल्यानेच , अहिंसेने मात्र नव्हेच नव्हे !
हो आता भारत स्वतंत्र तर आहे . या वर्षात तर आपण भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वे वर्ष मोठ्या उत्साहाने व गर्वाने साजरे करत आहोत . पण आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य आपल्या पूर्वजांनी केले पण तेच टिकवून ठेवण्याचे ही महत्वाचे कार्य आपल्याला सुरूच ठेवायचे आहे . आणि हे टिकविण्यासाठी परत आपल्याला अनेक आधुनिक शस्रांनी युक्त असे बलाढ्य भारतीय सैन्य उभे करावे लागणार आहे . भारताचे जसे बाह्य शत्रू आहेत (चीन, पाकिस्तान इ ) तसेच अंतर्गत शत्रु ही आहेत . दोन्ही पातळीवर आपल्याला कदाचित ही लढाई लवकरच लढावी लागणार आहे . सध्या भारतीय सैन्याची संख्या जवळपास ४० लाख आहे ,म्हणजे एकूण १४० कोटींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त ०.००३% . त्यामुळे अलीकडच्या काळात जी अग्निवीर योजना भारत सरकारने सुरू केली आहे , तिचे महत्व अधोरेखित होते .
पण आपल्या देशाचे दुर्दैव असे की या योजनेला ही विरोध झाला . कारण वयाच्या २१ व्या वर्षी नोकरीला लागून वयाच्या ६० व्या वर्षांपर्यंत नोकरी करण्याची गुलामीची मानसिकता ! या मानसिकतेमधून भारतीय तरुणाने आता बाहेर पडलेच पाहिजे . कारण वय वर्षे १७ ते २१ या वेळात सैन्यात शिरा , आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन कणखर व सक्षम बना . त्यांनतर मग अनेक क्षेत्रे या तरुणांसाठी खुली होतील . शिवाय या प्रकारच्या भरतीमुळे तरुणांमध्ये योग्य वेळी देशभक्ती चे बीज रोवले जाईल व पुढे त्याचा देशाला ही कायमच फायदा होईल .
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सैन्यभरती आवश्यक होती , आजची सैन्यभरती स्वातंत्र्य टिकविण्यासाठी व भारताला जगातील एक प्रबळ राष्ट्र बनविण्यासाठी आवश्यक आहे .
अग्नीवर योजनेतून तरुणांना रोजगार तर मिळेलच पण त्याबरोबर त्यांच्यात शिस्त , योजनाबद्ध काम करणे , वाट्टेल त्या परिस्थितीला तोंड देणे या सवयी त्यांच्यात येतील . मग पुढे आयुष्यात त्याना हे कुठल्याही क्षेत्रात उपयोगी पडेल . शिवाय पुढे जाऊन त्यांनी अगदी सैन्यात काम जरी नाही केले तरी युद्ध कसे लढतात हे त्यांना माहीत असेल व गरज पडली तर ते त्वरित भारतीय सैन्याच्या मदतीला जाऊ शकतील . मग ती मदत अंतर्गत एखाद्या संकटाविरोधात असेल किंवा बाहेरच्या शत्रू च्या विरोधात असेल !
म्हणूनच आपण हे जाणले पाहिजे की स्वातंत्र्य टिकवायचे असेल व भारताला मजबूत करायचे असेल तर दुसऱ्या महायुद्धात ज्याप्रमाणे मोठी सैन्यभरती झाली , तशाच प्रकारे आजही करणे अत्यावश्यक झाले आहे व ते अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केलेच पाहिजे.
© हेमंत सांबरे
Comments
Post a Comment