Esrael, Mosad and Rest World ! इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !- हेमंत सांबरे


*इस्रायल , मोसाद व बाकीचे जग !* 

मोसाद हे नाव ऐकले नाही असा एकही वाचक मिळणे विरळा आहे . मोसाद म्हणजे इस्रायल नावाच्या छोट्या पण अत्यंत शक्तिशाली देशाची गुप्तहेर संस्था आहे . मोसादने स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी  अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे करून दाखवली आहेत . तसा अवघा इस्रायल देश व त्यांचे नागरीक " *राष्ट्र प्रथम* " या तत्त्वावर चालतात , म्हणूनच त्यांना एखाद्या उघड युद्धात हरवणे अशक्यप्राय आहे . 

अलीकडेच काही दिवसांपूर्वी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायल वर अमानुष हल्ला करत , अनेकांना क्रूरपणे ठार केले , अनेक महिला व लहान मुलांना ही त्यांनी सोडले नाही . या हल्ल्याच्या निमित्ताने इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष व त्याची चर्चा पुन्हा जगाच्या पटलावर सुरू झाली . 

अलीकडेच रुपाली भुसारी लिखित " दहशतवादाच्या विरोधात इस्रायल" हे अतिशय उत्तम पुस्तक माझ्या वाचनात आले . एकूण वीस प्रकरणे असलेल्या पुस्तकात लेखिकेने अत्यंत उत्तमपणे इस्रायल चे दहशतवाद विरोधी धोरण कसे आहे व मोसाद ची कार्यशैली याविषयी सांगितले आहे . 
त्याशिवाय पूर्वी मी ना ह पालकर लिखित " छळाकडून बळाकडे " हे पुस्तक ही वाचले होते . 

शत्रूला कुठलीही दया न दाखवता त्याला ठारच केले पाहिजे हीच इस्रायलची पॉलिसी आहे (Zero Tolerance Policy )त्यामुळेच सगळ्या बाजूंनी शत्रू राष्ट्रांनी वेढलेले असूनही हे राष्ट्र दिमाखात प्रगती करत आहे . शिवाय शत्रू भविष्यात आपल्या विरोधात  काय करू शकते हे आधीच शोधून , शत्रूचे हे कारस्थान देखील  उध्वस्त करणे हे ही इस्रायलला उत्तम जमते . जसे त्यांनी इराण व सीरियाचा होऊ घातलेले अणुभट्टी उभारणीचे प्रकल्प थेट बॉम्ब वर्षाव करून उध्वस्त केले . 

जर्मनीत झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली . त्यावेळी या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या  प्रत्येक दहशतवाद्याचा सतत वीस वर्षे  जगाच्या कानाकोपऱ्यात शोध घेत ,मोसाद ने ही त्यांची ही हत्या करत बदला घेतला ..हे वाचून आपणही स्तिमित होतो .

दुसऱ्या महायुध्दात हिटलरचा सहकारी असलेला आईकमान हा ज्यूंचा क्रमांक एकचा शत्रू होता . त्यानेच लाखो ज्यूंना गॅस चेंबर कडे घेऊन जात, त्यांच्या अतिशय क्रूर हत्या केल्या होत्या . महायुद्ध संपून अनेक वर्षे होऊनही ज्यू व इस्रायल त्याला विसरले नाही . मोसाद ने त्याचा शोध घेतला , त्याला पकडून आपल्या देशात आणून ,त्याच्यावर रीतसर खटला चालविण्यात आला व त्याला  फाशीची शिक्षा दिली . ही अशी काळजाचा थरकाप उडवणारी गोष्ट ऐकून आपण मनोमन इस्रायलच्या  शुर कमांडो सैनिकांना सलाम करतो .
आपल्याला जे हवे आहे  ते घडवून आणताना ते अगदी नैसर्गिक वा सहज वाटले पाहिजे , अशा प्रकारे घटना घडवून आणणे ही मोसाद ची कार्य पद्धती अतिशय अद्भुत अशी आहे . 

मिग् -२१ विमान ही एकेकाळी फक्त रशियाची मक्तेदारी होती . हे विमान त्याकाळातील सर्वात श्रेष्ठ असे युद्धातील विमान होते . हे असे विमान रशियाने इराकला दिले , पण अमेरिका वा इस्रायल यांना कधीच दिले नव्हते . मग  इस्रायलने जगाला अशक्य वाटेल असे " ऑपरेशन डायमंड " राबवले . या ऑपरेशन मध्ये इस्रायलने एक पूर्ण  विमान इराक मधून पळवून इस्रायलला कसे आणले , हे जाणून घेणे  खरेच थरारक आहे . रहस्य कथा लेखकांना देखील ज्या कल्पना कदाचित सुचणार नाही, ते मोसाद व इस्रायलने करून दाखवले  . पुढे जाऊन मग इस्रायलने हे मिग २१ चे  तंत्रज्ञान अमेरिकेलाही काही इतर गोष्टींचा मोबदला घेऊन विकले .

इस्लाम धर्म अतिशय वेगाने पूर्ण जगात आपले हातपाय पसरत आहेत .भल्या बुर्या अशा सगळ्याच मार्गांनी पसरत आहे . अशावेळी या सगळ्या अरब मुस्लिम  राष्ट्रांना पुरून उरणारा व त्यांना एकाच वेळी युद्धात हरवणारा  इस्रायल सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे .

सावरकर म्हणत त्याप्रमाणे " राष्ट्राच्या सीमा चरख्याच्या सुताने  नव्हे , तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात "  हे वाक्य इस्रायल ने अक्षरशः खरे करून दाखवले आहे . त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायला मोठमोठी राष्ट्रे आज घाबरतात , त्याचे कारण त्यांची शस्त्र सज्जता व  दिवसेंदिवस वाढत असलेली  त्यांची तंत्रज्ञानातील झेप !.

अजून एक थरारक प्रकरण !  विमान अपहरणाचे  हे प्रकरण तर पूर्ण जगभर गाजले होते . २७ जुन १९७६ रोजी अथेन्स येथून चार अतिरेक्यांनी इस्रायली प्रवासी असलेल्या एअर फ्रान्स फ्लाईट -१३९ या विमानाचे अपहरण केले . पुढे हे विमान युगांडा येथील ऐंटेबी येथे उतरविण्यात आले . युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन हा अतिरेक्यांना सामील झाला होता . दुसऱ्या देशाच्या भूमीवर आपली विमाने उतरवून ,इस्रायली कमांडो सैनिकांनी कशा प्रकारे सगळ्याच प्रवाशांची जिवंतपणी सुटका केली असे हे' ऐंटेबी ऑपरेशन ' मुळातून वाचण्यासारखे आहे . अशा प्रकारे त्या आधी ही कुठल्याही देशाला हे जमले नव्हते व कदाचित त्यानंतर ही कुणाला जमलेले नाही .

ज्यू धर्म हा २५०० पेक्षा जास्त वर्षे जुना धर्म आहे . काही शतकांपूर्वी त्यांना त्यांच्या मूळ भूमीवरून हाकलण्यात आले . दुसऱ्या महायुध्दात ज्यू लोकांनी ब्रिटन व अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. त्याचवेळी ज्यू लोकांनी आपले स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असावे अशी मागणी जोराने रेटली . त्याचाच परिपाक म्हणजे ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन ची फाळणी करून इस्रायल नावाचे राष्ट्र ज्यूंना बहाल केले . हे घडले १९४८ साली . त्या  वेळी मोठ्या प्रमाणात जगभरातून ज्यू लोकांनी इस्रायल मध्ये यायला सुरुवात केली . याच क्षणापासून चहूबाजूंनी शत्रू राष्ट्रांनी वेढलेले इस्रायल हे सतत युद्धमय राष्ट्र झाले आहे . तरीही येथल्या लोकांचे राष्ट्रप्रेम , प्रत्येक घरात लष्करी शिक्षण यामुळे हा देश आजच्या घडीला खूप मजबूत झाला आहे . मला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची आठवण होते आहे . कारण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी यांच्या मृत्यूनंतर ही स्वराज्य का व कसे टिकले हे जर आज कुणाला  समजून घ्यायचे असेल तर इस्रायल चे ताजे उदाहरण आपल्या समोर आहे . कारण क्रूर औरंग्या जेव्हा लक्षावधी मुघल सैन्य घेऊन स्वराज्य जिंकू पाहत होता (१६८१ ते १७०७) , तेव्हा मराठ्यांच्या घरात प्रत्येक जण सैनिक झाला होता . अगदी घराघरातील महिला ही शस्त्र चालवणे जाणत होत्या , म्हणूनच स्वराज्य टिकले व पुढे चहू दिशांना वाढतच गेले .

 इस्रायल चे जगात कुठलेही नामोनिशाण ही नव्हते ,तेव्हा त्या काळात भारतातील दूरदृष्टी असणारे नेते वीर सावरकर यांनी इस्रायल बद्दल काय सांगितले होते ते पहा, 

 *इस्रायल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर* 

यहुदी वा ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन मध्ये स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे यासाठी सावरकरांचा पूर्ण पाठिंबा होता . ज्यू स्वतःचे राष्ट्र निर्माण करतील हे त्यांनी खूप आधीच सांगितले होते (साल  १९२१ - हिंदुत्व  या पुस्तकात) 

याचवेळी नेहरू व त्यांचे सरकार या ज्यू राष्ट्राला विरोध करत होते व  अनेक बलाढ्य राष्ट्रे ( अमेरिका , ब्रिटन आदी ) इस्रायल निर्मितीस  पाठिंबा देत होते .त्यामुळे या बलाढ्य राष्ट्रांचा रोष ओढवून घेण्याचा धोका निर्माण झाला . या चुकीच्या व हास्यास्पद  परराष्ट्रीय धोरणाला सावरकरांनी विरोध केला . 

त्याचवेळी  हेच बलिष्ठ ज्यू राष्ट्र  आक्रमक आघाडी निर्माण करणाऱ्या मुस्लिम गटांना ( अरब राष्ट्रे ) यांना समर्थ प्रतिकार करण्याचे काम करेल , असे द्रष्टे सावरकर सांगतात . 

ते नमूद करतात की भारताने इस्रायल ला पाठींबा देणे हे भारताच्या हिताचे आहे "


दहशतवादाच्या विरोधात कसे लढले पाहिजे , याचे उत्तम उदाहरण इस्रायल ने जगापुढे कायम घालून दिले आहे . आजही हमास या क्रूर दहशतवादी संघटनेने सुरू केलेले हे युद्ध , इस्रायल नक्कीच हमासचा पूर्ण नायनाट करूनच  संपवेल याची खात्री वाटते . 

एकूणच आजही दहशतवाद विरोधी लढणाऱ्या इस्रायलला केवळ भारतानेच नाही , तर जगातील सर्व राष्ट्रांनी एकमुखाने पाठींबा देऊन हा दहशतवाद रुपी राक्षस कायमचा गाडला पाहिजे . 

© हेमंत सदाशिव सांबरे.
दिनांक - २९.१०.२०२३ .

Comments

  1. Replies
    1. likhan changle asle tari iran cha nuclear power plant nahi todla..ti iraq cha todla tari..anerikela kitti warshe iraq ne zunzawle..iran chi nuclear pranali palwun anli..pan ya navin ghatnacha ullekh tal la aahe !!

      Delete
  2. चांगले लिहिले आहे

    ReplyDelete
  3. संजय सुधाकर कुलकर्णी28 October 2023 at 22:13

    खूप छान.

    ReplyDelete
  4. खुप छान लेखन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर