#सावरकर एक वादग्रस्त वारसा १९२४-१९६६- लेखक विक्रम संपत . परीक्षण लेखन - हेमंत सांबरे

सावरकर एक वादग्रस्त वारसा:१९२४-१९६६
मूळ लेखक - श्री विक्रम संपत
मराठी अनुवाद - मंजिरी मराठे व रणजित सावरकर 

विक्रम संपत यांनी लिहलेल्या सावरकर चरित्राचा दुसरा खंड काल वाचून पूर्ण केला . पहिल्या खंडापेक्षा दुसऱ्या खंडाचा आवाका मोठा आहे व या खंडातील सावरकर मुख्यत्वे स्वतः सावरकर यांनी मांडलेले नाही (म्हणजे त्यांनी स्वतः या कालावधी बद्दल लिहलेले असे नाही ) . शिवाय हा एकूण ४२ वर्षांचा काळ आहे , जो अतिशय स्फोटक , रोमांचकारी घटनांनी भरलेला पण एखाद्या चित्रपटात शेवट सुखद होतो असा आहे (चरित्र नायकाचा मृत्यू जरी होती तरी त्याला याची देही याची डोळा देशाचे स्वातंत्र्य बघायला मिळते , म्हणून सुखद ) .

खऱ्या अर्थाने हे मी जे लिहीत आहे , ते या पुस्तकाचे परीक्षण नाही तर मला नेमके काय आवडले , हे पुस्तक वाचून मला सावरकर कसे समजले हे मला वाचकांना सांगायचे आहे . 
एकूण ६०८ पानांच्या या ग्रंथात १२ प्रकरणे आहेत . सावरकर तुरुंगातून सुटून रत्नागिरी येथे स्थानबद्ध होतात येथून सुरू झालेला हा प्रवास १९६६ ला सावरकरांचा मृत्यू होतो तेथे संपतो . यापूर्वी मी बाळाराव सावरकर ( शेवटच्या १५-२० वर्षांत असलेले सावरकरांचे स्वीय सचिव ) यांनी लिहलेले चार खंड मी वाचले होते . त्यातही रत्नागिरी पर्व, हिंदुं महासभा पर्व  अखंड हिंदुस्थान लढा पर्व व सांगता पर्व अशा प्रकारे चार खंडात याच कालावधीचे वर्णन आहे . त्यामुळे संपत यांच्या पुस्तकात नेमके  वेगळे काय ही उत्सुकता होती .. पण हे संपत लिखित पुस्तक अद्वितीय असेच आहे .. लेखकाने शक्यतो जसे आहे तसे , जसे घडले तसेच सांगितले आहे . त्यामुळे हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक संशोधनात्मक दस्ताऐवज झाले आहे व अभ्यासक लोकांसाठी एक महत्वाचे पुस्तक असे झाले आहे . विक्रम जी कुठेही विनाकारण चरित्र नायकाचे कौतुक ही करत नाही किंवा अकारण टीका ही करत नाही . पूर्ण पुस्तकभर लेखक तटस्थपणे आपल्यापुढे हा इतिहास व कालावधी  ठेवतो व आपणास सांगतो ' तुम्हाला कसे घ्यायचे तसे घ्या ' . विक्रम जी कुठेही स्वतःची मते घुसडत आहेत असे जाणवत नाही .. म्हणजे हे असे असे  घडले आहे , ते मी फक्त मांडतो आहे हा त्यांचा अभिनिवेश पूर्ण पुस्तकात वाचकाला जाणवत राहतो . या कालावधीत सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले होते त्यामुळे त्यांच्यातील राजकारणी माणसाचे दर्शन संपत यांनी अतिशय उत्तम रेखाटले आहे . सावरकरांच्या परखड स्वभावाने मात्र दीर्घ काळ त्यांना आपले अनुयायी टिकवता आले नाही हे ही सत्य  आपल्यासमोर येते .. 
या पुस्तकातील मला सर्वोच्च आवडलेली प्रकरणे म्हणजे प्रकरण ९ - हत्या, हिंसा आणि उन्माद तसेच प्रकरण १० - लाल किल्ल्यातील अभियोग . ही दोन्ही प्रकरणे म्हणजे लेखकाने या पुस्तकातील गाठलेला कळस आहे असे मला वाटते . कारण गांधीहत्या व त्यामुळे सावरकरांच्या  वैयक्तिक आयुष्यात झालेली उलथापालथ हे मुळातून सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो . मला स्वतःला कायम असे वाटायचे की , हा खटला सुरू असताना सावरकरांच्या आत (म्हणजे त्यांच्या मनात ) नेमक्या काय भावना असतील , असे मला कुठेही वाचायला असे मिळाले नव्हते .. सावरकर हे खूप खंबीर असे व्यक्ती होते ,  ज्यांनी अंदमान सारखी कठोर शिक्षा भोगली होती , त्यामुळे त्यांना तुरुंगवास म्हणजे फार काही विशेष असे नव्हतेच .. पण आपल्याच स्वतःच्या स्वतंत्र झालेल्या देशात जेव्हा आपलीच लोक त्यांना विनाकारण अडकवतात ,  तेव्हा स्वतः सावरकर यांच्या मनात नेमके काय चालले असावे , हे खूप मोठे गूढ असे होते व आहे . कारण सावरकर कधीही आपली दुःख बोलून दाखवत नसत.  विशेष म्हणजे सावरकर पूर्ण निर्दोष सुटतात तेव्हा हिंदुमहासभेला काँगेस सरकार विरोधात सावरकरांची विनाकारण बदनामी केल्याचा खटला उभा करायचा असतो तेव्हा मात्र सावरकर गांधीवादी झालेले दिसतात , सावरकर असा बदनामीचा खटला उभा करायला नकार देतात .. सावरकर सांगतात की यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ किंवा हेतू नसावा त्यामुळे मला असा बदनामीचा खटला परत लावायचा नाही . या व अशा बऱ्याच प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम वरील दोन प्रकरणे करतात .. याआधी मी वाचलेल्या पुस्तकांत या सगळ्या खटला प्रकरणात सावरकरांच्या भावना , त्यांचे या काळात वागणे कसे होते याबद्दल उत्तरे मिळाली नव्हती . लेखक स्पष्टपणे नमूद करतो की सावरकर याकाळात खूप संशयी झाले होते , सावध झाले होते ..आपण निर्दोष सुटलेच पाहिजे अशी त्यांची  सामान्य माणसासारखी सहज भावना होती .. ब्रिटिशांशी लढताना कधीही न घाबरलेला हा  योद्धा आपल्याच लोकांशी लढताना, स्वतःला निर्दोष सिद्ध करताना, कदाचित आयुष्यातील सर्वोच्च लढाई लढत होता ..या खटल्याचे सर्व कागदपत्रे सावरकरांनी स्वतः गोळा करून त्याचा अभ्यास केला होता .. त्यावरून त्यांची मानसिक  स्थितीचे आकलन आपणास होते . म्हणजे स्वतःला निर्दोष सिद्ध करताना त्यांना कुणावर ही अवलंबून  राहायचे नव्हते , असे दिसते .. विक्रम संपत यांनी खूप अभ्यास , संशोधन करून हे पुस्तक लिहल्याने प्रत्येक प्रसंगात ,घटनेत ते खूप खोलात गेल्याचे वाचकाला जाणवत राहते .. गांधीहत्या खटल्यात  याआधीच्या पुस्तकांत ज्या गोष्टी मला वाचायला मिळाल्या नव्हत्या त्याची कमी या पुस्तकाने बऱ्यापैकी भरून काढली असे मला वाटले . 
शेवटची दोन प्रकरणे म्हणजे प्रकरण ११ - संधिकाल व प्रकरण १२ - वादग्रस्त वारसा ही देखील वाचनीय झाली आहे . आयुष्याच्या शेवटच्या काळात प्रखर बुद्धीवादी झालेले सावरकर त्यांच्या जवळच्या लोकांना पटत नाहीत .. स्वतःच्या पत्नीचा मृत्यू झाल्यावर तिला घरी न आणता परस्पर स्मशानभूमीत न्यायला सांगतात , साधे तिचे शेवटचे दर्शन ही घेत नाहीत .. मृत्यू नंतर चे कुठलेही विधी करायला सावरकर नकार देतात .. काळाच्या पुढे सतत विचार करणारे  सावरकर स्वतःच्या संपत्ती मधील जास्तीचा हिस्सा मुलाला न देता मुलीला देतात ..पुस्तकांचे हक्क घरातील कुणाला न देता स्वतःचे सचिव श्री  बाळाराव सावरकर ( आडनाव फक्त सारखे , ते सावरकरांचे नातेवाईक नव्हते )  यांना देतात ... स्वतःच्या मृत्यू नंतर आपला देह विद्युत दाहिनीत दहन करा असे सांगतात ..

वादग्रस्त वारसा या प्रकरणात 'गांधीहत्या प्रकरण 'सावरकर व नेहरू यांच्या मृत्यू नंतर ही परत कसे बाहेर येते व त्यावरून सावरकरांना परत यात (मृत्यू नंतर ही ) कसे ओढले जाते याचे तपशीलवार वर्णन आले आहे . कपूर आयोगाने परत खटल्याचा अभ्यास करून स्वतःची मते मांडली आहेत , ते  येथे सांगितले आहे ..

एक अतिशय वेगळा विषय या पुस्तकात शेवटी घेतला आहे ,  जो आपल्या देशात दडपून टाकण्यात आला आहे , तो म्हणजे गांधीहत्या झाल्यानंतर विशेषतः "महाराष्ट्रात ब्राह्मणांचे झालेले नृशंस हत्याकांड"  .. अहिंसा मानणाऱ्या गांधींच्या अनुयायांनी संधी मिळताच  कशी हिंसा करत स्वतःच्या ब्राह्मण द्वेषाला वाट मोकळी करून दिली याचे वर्णन परिशिष्ट -१ मध्ये संपत यांनी स्वतः अनेक पीडित कुटुंबातील पुढच्या पिढ्यांची मुलाखत घेऊन किंवा त्यांची पत्रे मागवून सांगितले आहे ..  इतिहासातील काश्मीर फाईल्स सारखा हा ही एक लपवून ठेवलेला भाग आहे , ज्यावर अजून संशोधन झाले पाहिजे . 

एकूणच सावरकरांच्या स्फोटक आयुष्यातील अतिस्फोटक काळ अतिशय समर्थपणे लेखक श्री विक्रम संपत यांनी मांडला आहे . पुस्तक मोठे असल्याने व अशी पुस्तके घाईने वाचण्यासारखी नसल्याने मला एक महिना लागला .. पण मनोरंजक कादंबरी सारखे वगैरे नसूनही पुस्तक खाली ठेवावे असे वाटत नव्हते , परत परत हातात घेऊन वाचत राहावे असेच वाटत होते .. मूळ इंग्लिश असलेले पुस्तक मी मात्र मराठीत वाचले .. वाचकांना जी भाषा सोयीस्कर वाटेल त्यात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे ..
धन्यवाद 
©  हेमंत सांबरे 
०६/१०/२०२३.

Comments

  1. खूप छान सर तुम्ही स्वतः आधी अभ्यास करून आम्हा पर्यंत सावकारांचे विचार पोचवतात... तुमचं मनस्वी धन्यवाद

    ReplyDelete
  2. हा सारांश आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर