केदारनाथ -१७ जून - डॉ प्रकाश कोयाडे - पुस्तक परीक्षण -
#केदारनाथ १७ जुन
#लेखक - डॉ प्रकाश कोयाडे
#परीक्षण
मराठी साहित्य विश्वात ज्यांची पहिली कादंबरी प्रतिपश्चंद्र आली व त्या कादंबरीने खळबळ माजवून दिली . २०१९ साली आलेल्या या कादंबरीची सध्या २३ वी आवृत्ती प्रकाशित झाली असून , OTT platform वर या पुस्तकावर आधारित एक web series ही येत आहे . त्यामुळे अर्थातच डॉ कोयाडे यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल नक्कीच उत्सुकता होती .
त्यांची दुसरी कादंबरी केदारनाथ १७ जुन ही नुकतीच प्रकाशित झाली . मी हे पुस्तक माझे मित्र श्री नवनाथ जगताप यांच्या # पुस्तकविश्व या दुकानातून घेऊन कालच वाचून पूर्ण केले .
'१७ जुन २०१३ या दिवशी केदारनाथ ( उत्तराखंड ) याठिकाणी मंदाकिनी नदीच्या खोऱ्यात जो भयंकर असा महापूर आला होता व त्यामुळे जे भूस्खलन झाले ', हा विषय केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी लेखकाने लिहिली आहे .
जसे इतर कांदबरी विषयांत गूढ , रहस्य इ विषय घेऊन लिहले जाते तसा इथे " सुटकेचा थरार " असा प्रकार लेखकाने हाताळला आहे .
सिद्धार्थ नावाचा डॉक्टर व त्याचे कुटुंबीय या प्रलय संकटात सापडतात त्यानंतर तो खूप सारी संकटे सहन करून कशा प्रकारे स्वतःची सुटका करून घेतो , हे अतिशय प्रवाही पद्धतीने डॉ प्रकाश यांनी सांगितले आहे .
डॉ प्रकाश यांची लेखनशैली अतिशय उत्तम आहे , वाचताना ' पुढे काय ?' ही उत्सुकता टिकवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे .
भूस्खलन झाल्यानंतर कुटुंबाची ताटातूट झालेला सिद्धार्थ अनेक पर्वत रांगा पार करत , अनेक संकटावर मात करत असताना , शेवटी भारतीय सैन्याचे हेलीकॉप्टर येऊन त्याची सुटका करतात . २०१३ साली झालेल्या या महापुरात असे म्हणतात की ५०००० हून अधिक लोकांचा बळी गेला .
कादंबरीत कथेची मांडणी करताना काही तांत्रिक चुका झाल्या आहेत , असे वाचकाला वाटते . सिद्धार्थच्या मित्राचा मुलगा या महापुरात वाचतो , मग विविध प्रसंगात तो मुलगा व सिद्धार्थ एकमेकाला साथ देत ,एकमेकांचा आधार घेत वाटचाल करतात ,अशा अनेक घटना लेखक आपल्याला वर्णन करत जातो , आपणही वाचक म्हणून त्यात गुंतत जातो व त्या मुलाचाही जीव वाचला पाहिजे, असे वाचकाला वाटत राहते . पण शेवटी लेखक सांगतो त्या मुलाचे प्रत्यक्ष अस्तित्वच नसते , ' तो मुलगा बरोबर आहे ' असे वाटत राहणे हा फक्त सिद्धार्थच्या मनाचा खेळ असतो . हा शेवट वाचला तर , वाचकाला तो कदाचित पटणार नाही . कारण एका विहिरीत कोसळल्यावर सिद्धार्थच्या डोक्याला मार लागतो , त्यानंतर त्या प्रकारचे भास होण्याची Disorder त्याला झाली असती तर मान्य झाले असते , पण तो मुलगा सिद्धार्थला खूप आधी भेटतो असे कादंबरीत वर्णन केले आहे . त्यामुळे कथेची मांडणी करताना काहीतरी घोळ झाला आहे हे नक्की !
पूर्ण कादंबरीत नायक सिद्धार्थ आपल्यावर आलेल्या संकटांमुळे नास्तिक झालेला विविध प्रसंगात दिसून येत राहते , पण शेवटी त्याची सुटका होते तेव्हा तो " केदारनाथ बाबा की जय !" म्हणून देवावरचा आपला विश्वास पुन्हा प्राप्त करतो .
लेखकाने कादंबरीत अनेक ठिकाणी अतिशय सुंदर विचारांची पेरणी केली आहे . ती वाक्ये , त्या त्या प्रसंगात वाचताना आपल्याला खूप शिकायला मिळते .
बाकी कादंबरी थरारक झाली आहे , वाचनीय आहे .
कुठल्याही संकटात आपण स्वतःवरच विश्वास जर गमावला नाही तर आपण नक्कीच बाहेर पडू शकतो , पडतोच असा महत्वाचा संदेश ही आपल्याला मिळतो .
© हेमंत सदाशिव सांबरे
१८/११/२०२३ .
फारच सुंदर
ReplyDelete