एक भाकर , तीन चुली - पुस्तक परीक्षण - लेखन - हेमंत सांबरे
आजच देवा झिंजाड लिखित " एक भाकर , तीन चुली" हे पुस्तक वाचून पूर्ण केले . सध्या थोडी तब्येत बरी नसल्याने , घरीच असल्याने वेळ मिळतोय तो हे पुस्तक तीनच दिवसांत झपाट्याने वाचून काढले . केवळ महिनाभरात तीन आवृत्त्या प्रकाशित होत , हे पुस्तक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करणार आहे , त्यामुळे वाचण्याची उत्सुकता होतीच .. आपल्यातील बहुतेकांचे बालपण , नंतरचे आयुष्य, अतिशय सुरळीत , सुखात जर गेलेले असेल तर हे पुस्तक वाचून तुमची गात्र न गात्र थरारून उठतील , तुम्ही स्वतःच्या संकटाला कधीही संकट म्हणणार नाही ... इतके कष्ट , इतका अपमान , इतकी अवहेलना असे सारे काही वाट्याला येऊनही पारू (या पुस्तकाची नायिका ) फक्त पुढे पुढे चालतच राहते .. स्वतः अडाणी , निरक्षर असूनही आपल्या मुलाला शिकवायची जिद्द आपल्याला थक्क करून सोडते .. रूढी ,परंपरा , अंधश्रद्धा , अज्ञान यामुळे कशा प्रकारे आयुष्याची फरफट होत राहते , याचे जिवंत चित्रण या कादंबरीत पाहायला मिळते . जगाच्या पाठीवर प्रत्येक धर्मात , जाती मध्ये रूढी , अंधश्रद्धा इ मुळे सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर तो स्त्रियांचा झाला ...