तुम्ही ' सावरकर ' हा चित्रपट बघितला का ? - हेमंत सांबरे

*तुम्ही ' सावरकर ' चित्रपट बघितला का ?* 
© हेमंत सांबरे

#सावरकर 
# स्वातंत्र्यवीर सावरकर
#रणदीप हुड्डा 

काल संध्याकाळी अखेर हा सध्या बहुचर्चित असलेला चित्रपट बघितला . 

" *सत्य हे नेहमी एकाकी प्रवास करत असते"* , असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे . सावरकरांचे जीवन म्हणजे या वाक्याचे यथार्थ दर्शन आपणास करून देते . पण इतका सारा एकाकी प्रवास करूनही , सत्याची कास न सोडता जगत राहणे हे अगदी एखाद्या सावरकरांनाच काय ते जमू शकते .

मी खूप लहानपणी माझी जन्मठेप वाचले होते , त्यानंतर ही अनेक वेळा वाचले आहे , कारण हे पुस्तक म्हणजे माझ्या आयुष्याचे प्रेरणास्रोत आहे . 
रणदीप हुड्डा अमराठी असूनही त्याने सावरकरांची भूमिका जगली आहे . 

आपण चित्रपट बघत असताना समोर येणारी प्रत्येक फ्रेम , प्रत्येक प्रसंग खूप वेगाने आपल्या पुढून सरकत राहतात . तरीही प्रत्येक प्रसंग मनावर कोरला जातो , मग पुढे सरकतो . हे अगदी साहजिक आहे, कारण १८९७ ते १९५० इतका मोठा कालावधी तीन तासांत बसवणे ही कसरत आहे . तरीही हुड्डा ने अतिशय सयंत, ताकदीच्या अभिनयाने करून दाखवले आहे . 

अनेक प्रसंग सांगण्यासारखे आहेत , पण अंदमानातील प्रसंग अक्षरशः अंगावर येतात . पहिल्यांदा जेव्हा त्यांना एकलकोंडीत टाकले जाते , तेव्हा स्वतःची मानसिक शक्ती वाढावी म्हणून सावरकरांनी नेमके काय केले असेल, त्याची कल्पना हुड्डाने अचूक केली आहे , असे वाटले . जसे सावरकर त्या अंधारकोठडीत ही पुश अप्स काढतात . तिथे त्यांचे ही कसे हाल झाले ते ही खुप सत्याच्या जवळ जाईल असे दाखवले आहे . माझी जन्मठेप मध्ये या सगळ्या कष्टांचे वर्णन सावरकर ही करतात . पण ज्यांनी जन्मठेप वाचले आहे त्यांना हे  जाणवेल की त्या कष्टांचे , हालांचे वर्णन सावरकरांनी नर्मविनोदी पद्धतीने केले आहे . चित्रपटात मात्र ही दृश्ये हेलावून टाकणारी आहेत . जसे त्यांना संडासला (टॉयलेटला ) लागते ,तेव्हा  ते जोरजोरात दरवाजा वाजवतात , पण कोणीही येत नाही , प्रतिसाद देत नाही . 

त्यांच्या पाठीवर चाबकाचे फटके देण्यात येतात , तेव्हा तेथून ते आपल्या कोठडी कडे चालत जाताना " वंदे मातरम्" चे गीत वाजते ते दृश्य ही रणदीप हुड्डा ने खूप जबरदस्त केले आहे . 

त्याकाळातील सगळ्याच क्रांतिकारकांचे आदर्श , मार्गदर्शक सावरकर हेच होते . भगतसिंग , राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हे कायम सावरकर बंधूंच्या संपर्कात होते . फार कमी लोकांना हे माहीत असेल की बाबाराव सावरकर व आझाद यांच्या काशी येथे भेटी झाल्या होत्या . हे सगळेच कसे एकमेकांच्या  संपर्कात असत व एकमेकांना कसे सहकार्य करत हे ही हुड्डा ने अधोरेखित केले याचा खूप आनंद वाटला . सावरकर लिखित १८५७ चे स्वातंत्र्यसमर  हे पुस्तक तर दीर्घकाळ क्रांतिकारकांची गीता होते . 
सर क्रडॉक यांच्या अंदमान भेटीनंतर एका ब्रिटीश अधिकाऱ्याशी चर्चा करताना ते सावरकर हा अजूनही किती धोकादायक मनुष्य आहे , हे जेव्हा सांगतात आणि असेही सांगतात की अशा मनुष्याला मोकळे सोडणे योग्य होणार नाही .  तेव्हा अलीकडे काही विकृत लोक सावरकरांनी " माफीनामा " लिहून दिला म्हणून जे आरोप करतात त्याला जबरदस्त चपराक बसते . कारण हे असे काहीच झाले नव्हते की सावरकरांनी माफी मागितली व ब्रिटिशानी त्यांना लगेच सोडून दिले . किंबहुना ब्रिटिशांचा सावरकरांवर मुळीच विश्वास नव्हता . 

सावरकरांचे हिंदू मुस्लिम धोरण नेमके कसे होते , हे दाखवण्यात ही रणदीप हुड्डा यशस्वी झाला आहे . अंदमानात मुस्लिम कशा प्रकारे गरीब हिंदू बंदीवान बंधूंना धमकी देऊन मुस्लिम करत ते ही दाखवले व पुढे सावरकर त्यांना कसे तुळशीचे पान खाऊ घालून परत हिंदू करून घेत हे ही दाखवले . केवळ खाण्याने धर्म बुडत नसतो हे अंदमानात सावरकर त्या बंद्याना पटवून देण्यात बऱ्याच अंशी यशस्वी झाले होते. म्हणूनच सावरकरांनी अंदमान सोडताना इस्लामिक होऊ पाहणारे अंदमान बेट जिकडे तिकडे सुशिक्षित हिंदू बंदीवान बंधूंचे वर्चस्व होऊन न्यायाचे राज्य स्थापन झाले होते . 

पुढे जाऊन मुसलमानांचे लांगूलचालन करण्याच्या काँग्रेसच्या धोरणाने कसे भारतभूमीचे तुकडे झाले ,ते ही हुड्डा खूप छान दाखवतो . गांधी बरोबरच्या भेटीत सावरकर , " जर केवळ अल्पसंख्याक आहेत म्हणून जर तुम्ही मुस्लिमांचे लाड करता , तर मग त्याच न्यायाने शिखांचे / पारशी धर्मीय यांचे का लाड करत नाहीत ?." असे विचारून गांधींना अनुत्तरीत करतात . पुढे झालेल्या फाळणी ने हे सिद्ध होते की ' हिंदू - मुस्लिम ' प्रश्न सगळ्यात जास्त कुणाला समजला असेल तर तो सावरकरांनाच होय . पण सत्तेच्या मोहाने आंधळे झालेल्या नेहरूंना व काँग्रेसला हे समजून घ्यायचेच नव्हते. . आजही हा प्रश्न तेव्हढाच तीव्र आहे व यावर सावरकरांनी सांगितलेले उपाय आजही  लागू आहेत . 

स्वातंत्र्य मिळाल्यावर ही सावरकरांच्या आयुष्यातील संकटे त्यांची पाठ सोडत नाहीत . हे बघून प्रेक्षक म्हणून आपण भावनिक होऊन जातो . 

चित्रपटाचा शेवटी जी टॅग लाईन येते ती भारीच आहे ,
"आयुष्यभर अहिंसेचे पुरस्कर्ते असलेल्या गांधींची गोळ्या घालून हत्या होते , व सरसकट नव्हे पण तार्किक आणि स्वसंरक्षणार्थ गरजेच्या असलेल्या हिंसेचे समर्थन करणारे  सावरकर  मात्र उपोषण करून मृत्युला मिठी मारतात ". 

या चित्रपटाने अनेक आघाड्यांवर बाजी मारली आहे . सावरकरांच्या तोंडून हुड्डा ' *दृष्टिकोन* ' हा शब्द खूप वेळा म्हणताना दिसतो . हा आगळा वेगळा रणदीप हुड्डाचा दृष्टिकोनच या चित्रपटाला वेगळे बनवतो .  त्यावेळच्या अनेक तथाकथित नेत्यांपेक्षा सावरकरांचा दृष्टिकोन कसा वेगळा होता , पण कसा  देशहिताचा होता , हे सांगत हा चित्रपट संपतो . 

या चित्रपटाने सावरकरांना महाराष्ट्रातून बाहेर काढून पूर्ण देशाचे व काही प्रमाणात पूर्ण जगाचे ही बनवले आहे असे मला वाटते . 

रणदीप हुड्डाचा मी पाहिलेला हा पहिलाच चित्रपट होता . पण आता यापुढे रणदीप चा प्रत्येक चित्रपट बघणारच असा निश्चय करूनच आम्ही थेटर मधून बाहेर पडलो . 
मी ज्या सिनेमागृहात हा चित्रपट बघितला ते ९० % क्षमतेने भरले होते . त्यामुळे हा चित्रपट जोरात सुरू आहे ,  खोट्या अफवांवर बिलकुल विश्वास न ठेवता सुजाण नागरिकांनी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघावा अशी मी विनंती करतो . 
🙏
© हेमंत सांबरे
३१.०३.२०२४ .

(कृपया नावासहित लेख जसाच्या तसा पुढे पाठवावा ही विनंती )

Comments

  1. हो, सावरकरांच काहीपण वाचतोच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सावरकर का नको ?

नगरी भाषा - माझी मायबोली-हेमंत सांबरे

#इस्रायल आणी स्वातंत्र्यवीर सावरकर