माझी जन्मठेप - आत्मकथा - वीर सावरकर - पुस्तक परीक्षण
आत्ताच माझी जन्मठेप वाचून हातावेगळे केले. हे पुस्तक वाचण्याची नक्की कितवी वेळ आहे , हे मलाही आठवत नाही . इतक्या वेळा वाचूनही यावर लिहण्याची तीव्र ऊर्मी मात्र यावेळी खूप अशी दाटून आली आहे . हे पुस्तक वाचून मला समजले आहे , ज्या ज्या भावना माझ्या मनाला व्यापून राहिल्या आहेत त्या त्या(शक्यतो) सगळ्याच गोष्टी तुम्हाला ही कळाव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा झाली आहे ..
मी या आत्मकथेचे शेवटचे पान आत्ता उलटत आहे . अनेक वेळा सुटकेचे वृत्त येऊनही याआधी प्रत्यक्ष सुटका कधीही न मिळालेले सावरकर यावेळी मात्र खरेच आपली सुटका होणारच ,हे कळून खूप भावनिक झालेले आहेत . वाचक म्हणून आपल्याही मनात अनेक संमिश्र भावना दाटून येतात . या जन्मठेपेचे शेवटचे वृत्त वाचताना माझेही डोळे पाण्याने भरून आले आहे . पण हे कदाचित आनंदाश्रू आहेत , कारण या माझ्या कथेच्या नायकाची सगळ्या यातना मधून सुटका होत आहे म्हणून येणारे ते डोळ्यांतील अश्रू आहेत . दुसऱ्या बाजूने या दिव्य पुस्तकाची इतिश्री झाल्याने , आपण आता या पुस्तकापासून दुरावणार याचेही दुःख असेल का ? म्हणूनच अश्रू येत आहेत का ?? नक्की कळत नाही .
अर्थात वाचकाने हे पुस्तक वाचून रडावे म्हणून हे पुस्तक नक्कीच नाही . उलट आपल्या आपल्या आयुष्यातील संकटे , दुखे काहीच नाही अशी दुःखे, संकटे सावरकरांच्या व त्यांच्या बंधूंच्या आयुष्यात कशी येतात , त्यांच्याशी ते कसे लढतात हे बघून आपल्याला प्रत्येक पानावर , प्रत्येक वाक्यात नवीन उभारी हे पुस्तक देत राहते .
ही आत्मकथा वाचताना लक्षात येते की सावरकर स्वतःच्या दुःखाची कहाणी अगदी रंगवून सांगत आहेत असे मुळीच नाही . आपल्याकडे सगळा सहानुभूतीचा लोलक येत रहावा असेही सावरकर करत नाहीत . उलट अनेक प्रसंगात आपल्यापेक्षा इतर सहभोगी राजबंदी कसे जास्त कष्ट , दुःख भोगत आहेत , हेच सावरकर सांगतात . उलट या आत्मकथा वृत्तात स्वतःचे वृत्त सांगताना सावरकर नर्मविनोदी पद्धतीने आपल्याला सांगतात .
संपूर्ण सावरकर समजणे हा दीर्घ प्रवास असला तरी , त्यापैकी खूप सारे सावरकर " माझी जन्मठेप " वाचून समजू शकतात असा माझा ठाम विश्वास आहे .
सावरकरांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळावर हे पुस्तक असल्याने , त्यांच्या जीवनातील अत्युच्च तत्त्वज्ञान आपल्याला या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते .
सावरकरांची ही जन्मठेप प्रथम डोंगरी चे कारागृह , मग भायखळा , नंतर अंदमान (एकूण ११ वर्षे काळे पाणी ) , तेथून अलीपुर ( सध्याच्या प. बंगाल मध्ये ) , नंतर रत्नागिरी , शेवटी पुण्याचे येरवडा कारागृहात या तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण झाली आहे ( हुड्डा यांच्या चित्रपटात सुटका रत्नागिरी येथे झाली असे दाखवले ते थोडे चुकले आहे ) .
क्रांतिकार्य करताना शपथ घेतलेल्या सावरकरांचे आयुष्य म्हणजे अखंड पेटलेले यज्ञकुंड होते . ज्यांना आपल्या स्वतःच्या आयुष्यातील संकटे खूप मोठी वाटतात , त्यांनी हे पुस्तक एकदा वाचावे , परत परत वाचत राहावे असे आहे .
जेव्हा डोंगरीच्या कारागृहात त्यांना काथ्या वळायला देतात तेव्हा सावरकर म्हणतात ,
"काथ्याच कुटायचा इतकेच ना ! त्यात हलकेपणा काय आहे ! अरे हे आयुष्यही एक काथ्याकूट आहे ! पंचमहाभूतास पिळून वळून हे आयुष्याचे चऱ्हाट वळावयाचे ,तेच ते तंतू जोडून लांबवित बसावयाचे व शेवटी सडत आले की , मृत्यूच्या ' मोगरी ' ने कुटून पुनः काथ्या करून पंचमहाभूतां मध्ये मिसळून द्यायचे !
आपल्यातील बहुतेकांना माहीत आहेच की कमला , सप्तर्षी , गोमंतक ही काव्ये सावरकरांनी अंदमानात असताना रचली . कुठलीही लेखणी , कागद उपलब्ध नसताना मनातल्या मनात ही काव्ये त्यांनी रचून , ती पाठ करून तशीच्या तशी लक्षात ठेवून मग पुढे या ना त्या मार्गाने त्यांनी सुटका झाल्यावर प्रसिद्ध केली . असे करणारे सावरकर हे जगातील पहिले महाकवी ठरले . हे त्यांनी नेमके कशा प्रकारे केले , हे त्यांच्याच शब्दात खरोखर वाचण्यासारखे आहे . निराश न होता स्वतःमधील प्रतिभा जिवंत ठेवून अशा प्रकारे काव्य निर्मिती करणारे सावरकर आपल्याला अचंबित करतात .
अंदमानात आपल्याला अशिक्षित कैद्यांना शिकविण्यासाठी धडपड करणारे सावरकर भेटतात. मुसलमान झालेल्या हिंदूला परत हिंदू धर्मात आणता येते हे त्यांनी येथेच सिद्ध करून दाखवले (शुध्दीकरण) . अंदमान येथे अनेक सुधारणा त्यांनी घडवून आणल्या , ज्याद्वारे येथील सर्वच कैद्यांचे जीवन खूप सुसह्य झाले .
ज्या काळात हिंदूंची (बहुसंख्य असूनही पण त्यांच्यात एकी नसल्याने ) कुणीही बाजू घेत नव्हते , त्या काळात सावरकर सगळा विरोध सहन करून हिंदूंच्या बाजूने ठाम उभे राहिले . अन्यायाच्या विरुध्द तर ते कायमच उभे राहिले , मग तो अन्याय अगदी कुठल्याही जातीच्या वा धर्माच्या माणसांवर झालेला असला तरीही !
सगळे धर्म , जाती नष्ट होऊन संपूर्ण मानवजात हीच फक्त उरून , सगळ्याच मनुष्य जातीने फक्त प्रेमाच्या पाशाने एकमेकांशी जोडून राहावे असे सांगणारे सावरकर थोर मानवतावादी विचारवंत होते . माझी जन्मठेप या पुस्तकात जागोजागी याचे पुरावे आपल्याला सापडत राहतात .
तर्कशुद्ध विचारसरणी ( Logical Thinking ) कशी असली पाहिजे , याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपल्याला सावरकर प्रत्येक प्रकरणात देत राहतात .स्वतः वकील असल्याने त्या शिक्षणाचे पडसाद ही त्यांच्या लेखनात येतात .
आपण मनुष्य किंवा ही पृथ्वी देखील किती क्षुद्र आहे हे सांगताना त्यांची प्रतिभा गगन भरारी घेते.
ते म्हणतात ,
'' तुझे , त्यांचे , ह्या सर्व मनुष्य जातीचे तर काय ह्या सूर्याचे देखील प्रचंड विश्वाच्या उलाढालीत तिळमात्र तरी महत्त्व आहे काय ? एखाद्या साबणी फुग्यासारखा ती अभिमानाने फुगत उडालेला दिसतो आहे . पण क्षणार्धात विश्वाची मूळ शक्ती दुसरा एखादा खेळकर फुगा मारताच हा सूर्यही नाहीसा होईल , तरीही हे विश्व चालेलच ! " अशी उदाहरणे देऊन आपण कधीही कशाचाही अहंकार बाळगू नये असे सावरकर सांगून जातात .
साम -दाम -दंड -भेद अशा नितीवर विश्वास असणारे सावरकर अंदमानात ही त्याचा सतत वापर करताना दिसतात . मग ते अगदी लपून छपून बातम्या मिळवणे असो , किंवा आंदोलन करत करत सवलती , फायदे पदरात पाडून घेणे असो किंवा स्वतःची व इतर बंदिवान कैद्यांची सुटका करून घेण्यासाठी पत्रे लिहणे असो . सावरकरांचा माफीनामा म्हणून जो आजकाल खोटा प्रचार केला जातो , ते कसे खोटे होते याचे उत्तर आपल्याला हे पुस्तक वाचून मिळत जाते . त्याच कारणाने आपल्या सोबत्याना त्यांनी अंदमानात आंदोलने करताना कधीही प्राणांतिक उपोषण करून दिले नाही .
ज्यांना चांगले वाचक , लेखक व्हायची इच्छा आहे , त्यांनी या पुस्तकापासून सुरुवात करायला पाहिजे . ज्या अंदमानात एके काळी साधे कागद ठेवायला ही चोरी असायची , तेथे सावरकरांनी सुटेपर्यंत तेथे एक मोठे ग्रंथालय उभे केले होते . त्यांच्या जिद्दी स्वभावाची ओळख आपल्याला होते .
प्रतिकूल परिस्थितीत देखील कसे त्यांनी त्यांचे वाचन , लेखन सुरूच ठेवले हे वाचून आपल्याला प्रेरणा नक्कीच मिळते .
सावरकर अंदमानात येऊन बंद झाल्यामुळे त्यांना वाटायचे की बाहेरचे जग आता त्यांना विसरून ही गेले असेल . पण पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक राजबंदी अंदमानात शिक्षा लागून येतात . तेव्हा सावरकरांना असे दिसते की त्यातील कित्येक क्रांतिकारी लोकांनी सावरकर लिखित " १८५७ चे स्वातंत्र्यसमर" हे पुस्तक वाचूनच प्रेरित झाले आहेत . ते बघून त्यांना मनोमन समाधान वाटते .
बारी व सावरकर यांचा उल्लेख केल्याशिवाय कसे पुढे जाता येईल ? हा अतिशय कठोर स्वभावाचा बंदिपाल म्हणजे तेथे येणाऱ्या कैद्यांचा कर्दनकाळ होता . पण पुढे जाऊन सावरकर व तेथील इतर राजकीय बंदीवान मंडळीच्या चिकाटी पुढे तो ही कसा मऊ पडतो हे वाचून आपल्याला विशेष वाटते .
सुशिक्षित माणसाची व्याख्या सावरकर सांगतात ती अशी ,
" तो खरा शिक्षित की जो लोकांच्या दुःखाने कळवळून त्यांचे सुखासाठी स्वतःच्या यातनास यत्किंचित मानतो "
त्यांचे इतर काही अद्भुत पण व्यावहारिक (practical ) विचार बघा ,
" अनुकूल असेल तेव्हाच बातमी ऐकणे हा मूर्ख लोकांचा स्वभाव असतो . शूर आणि कर्तबगार पुरुष प्रथम प्रतिकूल बातमी माहीत करून घेतो "
" जीवन हे जिवोजिवी समसंवेदन झालेले असते . केवळ सहानुभूतीने ते जगून पाहा "
पुस्तकांबद्दल सावरकर म्हणतात ,
"पुस्तक नुसते पडून आहे यापेक्षा वाचून वाचून फाटून गेले ही तक्रार मला जास्त आवडते "
लोकप्रियता पेक्षा लोकहित कसे व का महत्वाचे आहे हे सांगताना ते म्हणतात ,
" केवळ लोकप्रियतेसाठी म्हणून लोकहितकारक वाटणारे कार्य सोडणे हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे " हे असे वेळोवेळी केल्यानेच सावरकरांना भोवती लोक गोळा करता आले नाही .
अंदमानातील त्यांच्या शेवटच्या दिवसाचे वर्णन मुळातून वाचले पाहिजे . यातली एक प्रकरण आपल्यातील काहीना मराठीच्या धड्यात होते . त्यात त्यांच्या गळ्यात कशा प्रकारे सगळे निर्बंध झुगारून एक कैदी चाफ्याच्या फुलांची माळ घालतो ते वाचायला मिळते . तेव्हा सावरकर म्हणतात की ,
" मज विषयी लोकांत अप्रिती व भय निर्माण करण्याच्या सरकारी आटोकाट प्रयत्यांना ती चाफ्याच्या फुलांची माळ हे अखंडनिय उत्तर होते ! "
रूढ अर्थाने हे मी लिहलेले या पुस्तकाचे परीक्षण असे नाही . पण मला नेमके काय भावले हे तुम्हा वाचकांना सांगणे आहे .
.तुम्ही कधीही हे पुस्तक वाचले नसेल तर लवकर मिळवून हे वाचा . तुम्ही याआधी वाचले असले तरी परत एकदा वाचा , पुन्हा पुन्हा वाचत राहा . आपल्या १२ वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना , मुलींना हे नक्की वाचायला सांगा .
जो हे पुस्तक वाचेल त्याच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी कुठलेही गैरसमज कधीही तयार होणार नाहीत . त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा ज्यांना प्रचार करायचा असेल त्यांनी स्वतःही वाचावे व सतत इतरांना ही वाचण्यास सांगावे ...
माझे आयुष्य या पुस्तकाने सतत बदलले आहे. तुम्ही वाचा , तुमचेही निश्चित बदलेल !
© हेमंत सांबरे
( कृपया लेख असाच्या असा पुढे पाठवण्यास कुठल्याही परवानगी ची गरज नाही )
धन्यवाद
Comments
Post a Comment