'कोई दिक्कत नही ' अर्थात आमची उत्तरप्रदेश यात्रा ! - हेमंत सांबरे
कोई दिक्कत नही!
( अर्थात आमची उत्तरप्रदेश यात्रा )
अर्थात आम्ही काही पूर्ण उत्तरप्रदेश फिरलो असे नाही . पण माझ्या व माझ्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रवास होता .
मागच्या वर्षी आम्ही दक्षिणेत म्हणजे हंपी बदामी केले तर यावेळी उत्तर दिशा पकडुन आम्ही अयोध्या ( प्रभू श्रीराम जन्मभूमी दर्शन ) , प्रयागराज , वाराणसी ची यात्रा पूर्ण केली .
आधीच्या एका पोस्टमध्ये मी आमच्या अयोध्या दर्शन बद्दल थोडेसे लिहले होते , पण आता यात्रा पूर्ण झाल्यावर एकूणच उत्तर प्रदेश बद्दलचे आमचे अनुभव याबद्दल सविस्तर लिहावे असे वाटले म्हणून ही धडपड !
या प्रदेशांत दीर्घ काळ मुघलांनी राज्य केल्यामुळे इथे अजूनही अनेक मुसलमानी खुणा दिसतात . अनेक गावांची नावे अजूनही मुघली आहेत , ते बदलण्याचे काम ही योगी जी यांच्या नेतृत्वात सुरू आहे . याच राज्यात आग्रा शहर असून जेथे जगप्रसिद्ध ताजमहाल आहे , पण गेल्या वर्षभरातच ही ओळख (ताजमहालाची ) पुसली जाऊन याच राज्यात आता जगप्रसिद्ध असे भव्य दिव्य असे प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले आहे . नुकत्याच आलेल्या ताज्या आकडेवारीवरून २२ जानेवारी २०२४ पासून आजपर्यंत तब्बल १३.५ कोटी हिंदू भाविकांनी अयोध्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे , हा आकडा ताजमहाल येथे भेट देणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे . मंदिराचे काम अजूनही सुरू असले तरीही जे काही मंदीर उभे झाले आहे , ते पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले . मंदीर प्रशासन अतिशय शिस्तबध्द काम करत असल्याने कुठलाही त्रास न होता आमचे दीड तासाच्या आत दर्शन ही पूर्ण झाले . अयोध्या हे तसे काही फार मोठे शहर नाही , पण आता राम मंदिर झाल्याने हे शहर लवकरच जगातील क्रमांक एक चे पर्यटन स्थळ होणार यात काही शंका वाटत नाही . विशेष म्हणजे दर्शन घेण्यासाठी येथे कुठलेही शुल्क आकारले जात नाही , तरीही सर्व व्यवस्था एकदम चोख आहेत .
अयोध्या झाल्यावर आम्ही प्रयागराज येथे गेलो . याठिकाणी गंगा , यमुना व सरस्वती ( गुप्त स्वरूपात ही नदी येथे मिळते अशी मान्यता आहे ) यांचा संगम आहे . याठिकाणी होडीतून प्रवास करत आम्ही संगमाच्या ठिकाणी जाऊन गंगा मैयाची पूजा केली . इथल्या नद्या म्हणजे लांबच लांब पसरलेला जणू सागरच वाटतो . आपण त्यांचे विस्तृत पात्र बघून स्तिमित होतो .
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान जेथे झाले त्याठिकाणी आम्ही भेट देऊन त्यांना वंदन केले .
प्रयाग करून आम्ही वाराणसी कडे निघालो . योगिंचे राज्य आल्यावर येथील रस्त्यांची कामे प्रचंड झाली आहेत . यूपी मधील लोकांशी बोलताना त्यांच्या बोलण्यात बाबा ( योगी यांना हे लोक नुसतेच बाबा म्हणतात ) बद्दल खूप अभिमान दिसला .
आता वाचकाना लेखाचे शीर्षक " कोई दिक्कत नही" असे का आहे त्याचे कारण सांगतो . कोई दिक्कत नही हे वाक्य म्हणजे येथील लोकांचा Over Confidence सतत दाखवत राहण्यासाठी वापरले जाणारे वाक्य आहे . आमचा टॅक्सी ड्रायव्हर , हॉटेल मधील वेटर , आमचे गाईड्स , आमच्या होडीत असणारा नावाडी अशा प्रत्येकाला आपण काहीही विचारले तरी प्रत्येकजण हे वाक्य बोलून आपल्याला सांगणार " कोई दिक्कत नही" .
मी २०१८ या वर्षी वाराणसी येथे आलो होतो . तेव्हाची काशी व आत्ताची काशी मला पूर्ण वेगळी वाटली . तेव्हाचे बाबा विश्वनाथ मंदीर अनेक घरं व अरुंद गल्ल्या यांनी वेढलेले होते . त्यामुळे दर्शन घेताना खूप वेळ ही लागत होता . पण आता मात्र नवीन काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाल्याने महादेव ही मोकळा श्वास घेत आहेत . आम्ही चार क्रमांकाच्या गेटने प्रवेश करत बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेतले . या गेट मधून प्रवेश करताना तीच ती वादग्रस्त ज्ञानवापी मशीद ही दिसते . ही मशीद म्हणजे हिंदूंच्या हृदयातील अजून एक भळभळती जखम आहे . क्रूर औरंगजेबाने १६६९ मध्ये मूळ ज्ञानवापी महादेवाचे मंदीर उद्ध्वस्त करून येथे ही मशीद उभारली . सध्या विष्णू शंकर जैन हे थोर हिंदू गृहस्थ याची लढाई न्यायालयात लढत आहेत . लवकरच निकाल हिंदूंच्या बाजूने लागून , हे जुने मंदिर ही हिंदूंच्या ताब्यात येईल अशी शक्यता आहे . मनात विचार आला की बाबा विश्वनाथ बरोबर श्री विष्णू शंकर जैन यांचे ही दर्शन घेतले पाहिजे . पण ते कसे शक्य होईल हे कळले नाही . आम्ही रांगेतून पुढे सरकत असताना, लोकांशी बोलताना , लोकांच्या मनातील चीड लपत नव्हती . सध्याचे मंदीर पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७७१ मध्ये बांधले असून , त्यांचा सुबक असा पुतळा बाबा विश्वनाथ कॉरिडॉर मध्ये उभारून त्यांचा योग्य असा सन्मान केला गेला आहे .
प्रसिद्ध क्रांतिकारक व विदा सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर हे देखील काही काळ वाराणसी येथे राहत असत. ते कुठे राहत ती जागा शोधण्याची उत्सुकता मनात होती, पण वेळेअभावी विचार केला की ते पुन्हा केव्हातरी !
सायंकाळी सहा नंतर आम्ही गंगेच्या तीरावर सुप्रसिद्ध अशा " गंगा आरती " ला उपस्थिती लावली. ही आरती जरी अनेक वर्षापासून सुरू असली तरी, आपले आदरणीय पंतप्रधान श्री मोदी यांनी येथे येऊन आरती करायला सुरुवात केल्यापासून या उपक्रमाला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली . आमचे या पूर्वीचे कुठलेही प्रधान मंत्री स्वतः हिंदू असूनही हिंदूंच्या भावनांची कधीही कदर करत नसायचे , पण मोदींनी हे चित्र पूर्ण बदलून टाकले आहे .
आम्ही गंगेत एका बोटीवर बसून हा भव्य सोहळा बघितला . अक्षरशः या घाटावर यावेळी ५००००पेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती असावी . बोटीतून फिरून आम्ही सगळे घाट ही बघितले . जुन्या काळातील हिंदी अभिनेता प्रदीप याने ही इथे एक घाट बांधला आहे . प्रसिद्ध हिंदी लेखक मुंशी प्रेमचंद यांच्या नावाने देखील एक घाट असून , याच घाटावर बसून ते आपल्या कहाण्या लिहीत असत .
पूर्वीचे यूपी व आत्ता चे यूपी खूप वेगळे आहे . झपाट्याने बदलत आहे . आम्ही जितका काही प्रवास केला , रस्ते अतिशय उत्तम होते . कुठेही आम्हाला अडचण अशी जाणवली नाही.
निघताना पुढच्या वेळी मथुरा वृंदावन इ भेट देण्याचा निर्णय करून आम्ही यात्रा संपवून लखनौ येथून ट्रेनचा प्रवास करून पुण्यात परत आलो .
© हेमंत सदाशिव सांबरे
२८/१२/२०२४
बहुत अच्छा लिखा है आपने..बढ़िया लगा..ऐसे ही लिखते रहिये हम पढ़ते रहेंगे कोई दिक्कत नहीं जी
ReplyDelete